जम्मू-काश्मीरच्या पहलाग येथील दहशतवादी हल्ल्याचा भारताने अखेर बदला घेतला आहे. भारताने पाकिस्तानात असणाऱ्या 9 दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या हद्दीत न जाता हे हल्ले करण्यात आले आहेत. या कारवाईतून भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्याची भावना देशभरात व्यक्त होत आहे. या दरम्यान या हल्ल्याची तुलना उरी हल्ल्यासोबत केली जात आहे. पण ही कारवाई वेगळी आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.
१) ऑपरेशनची पद्धत
जेव्हा एखाद्या व्यक्तीला आजार होतो आणि ऑपरेशन करायची गरज भासते त्यावेळी ते ऑपरेशन एका विशिष्ठ ठिकाणी, विशिष्ठ भागात किंवा अवयवावर केलं जातं. त्याच पद्धतीने उरी हल्ला हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये विशिष्ठ ठिकाणी, विशिष्ट भागात दहशतवाद्यांच्या लाँचपॅडवर केलेला एक मर्यादित असा एक सर्जिकल स्ट्राईक होता. तर ‘ऑपरेशन सिंदूर’ हे एकाच वेळी बहावलपूर, मुरीदके, गुलपुर, भींबर, चक अमरू, बाघ, कोटली, सियालकोट आणि मुजफ्फराबाद अशा ९ ठिकाणांवर करण्यात आलं होतं.
२) ऑपरेशनची गुप्तता
उरी सर्जिकल स्ट्राईकचं खरं नाव हे ऑपरेशन एक्स असल्याचं संरक्षण अभ्यासक सांगतात. मात्र सैन्यदलाने या ऑपरेशनचं खरं नाव अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही. त्यामुळे उरी हल्ला हा सर्जिकल स्ट्राईक म्हणूनच ओळखला जाऊ लागला. मात्र पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जाणीवपूर्वक कुटुंबातल्या पुरूष सदस्यांना मारलं. महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेल्यामुळे त्यांना अकाली वैधव्य आलं. केंद्र सरकार देशातल्या प्रत्येक भारतीयाच्या पाठीशी आहे हे दाखण्यासाठी आणि महिलांना आलेल्या अकाली वैधव्याचा बदला घेण्यासाठी या एअरस्ट्राईकला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं. ज्यामुळे पीडितांना मानसिक आधार मिळाला.
३) हद्द
उरी सर्जिकल स्ट्राईक हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आला होता. त्यावेळी आपल्या फायटर विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला होता. मात्र ऑपरेशन ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये फक्त पीओकेच नाही तर पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांना लक्ष्य केलं तेही भारताच्या हद्दीतून.
४) पाकिस्तानकडून प्रत्युत्तर
उरी हल्ल्याच्या नंतर पाकिस्ताने असा हल्ला झाल्याचा किंबहुना काही दहशतवादी मारले गेल्याचा वृत्ताचा इन्कार केला होता. ज्या दहशतवाद्यांच्या लाँचपॅडला लक्ष्य करण्यात आलं होतं त्याची जबाबदारी नाकारली होती. मात्र ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर हल्ला झाल्याचं पाकिस्तानला मान्य करावं लागलं आहे. कारण आधी सांगितल्या प्रमाणे हा हल्ला फक्त पाकव्याप्त काश्मीरमध्ये नसून पाकिस्तानमध्ये सुद्धा झालाय. या हल्लानंतर काही निष्पाप नागरिकांना मारल्याच्या खोट्या तक्रारी पाकिस्तानकडून करण्यात आल्यात. याचाच अर्थ भारताने पाकिस्तावर एअर स्ट्राईक केल्याची कबुली पाकिस्तानने दिली आहे.
५) सैन्याचा सहभाग
उरीमध्ये झालेलं सर्जिकल स्ट्राईक हे हवाई दलाने केलं होतं. या सैन्यदल किंवा नौदलाचा सहभाग नव्हता. मात्र ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्यदलाची मदत घेण्यात आली होती. दहशतवादी छावण्यांवर कमी पल्ल्याचे हल्ले करताना तोफांचा वापर करण्यात आला होता.
भारताकडून अधिकृत / कायदेशीर हल्ला
जेव्हा दोन देशांमध्ये तणाव निर्माण झालेला असतो तेव्हा एखाद्या देशाने हल्ला केला तरीही ते हल्याची जबाबदारी नाकारतात. मात्र भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तामध्ये शिरून थेट हल्ला जरी केला असला तरीही जबाबदारी नाकारलेली नाही. उलट भारताने संरक्षण सचिव विक्रम मिसरी, सैन्यदलाच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग या तिघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत हल्ल्याचं समर्थन केलं. ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानी लष्कर किंवा पाकिस्तानी नागरिकांसाठी नाही तर दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेली कारवाई होती. ही कारवाई तांत्रिक भाषेत Preemptive म्हणजे काही घडण्याआधीच त्याला आळा घालण्यासाठी किंवा त्याची शक्यता नष्ट करण्यासाठी केलेली कृती अशी मानली जाते त्यामुळे अशी कारवाई किंवा एअर स्ट्राईक हा युद्धाचा व्याख्येत बसत नसल्याची प्रतिक्रिया संरक्षण विषयाचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळणाकर यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनशी बोलताना दिलीये.

