• Wed. Mar 11th, 2026

    मराठवाड्याला गारपिटीनं झोडपलं, तिघांचा अंत; शेती, फळबागांचं नुकसान, पुढील 2 दिवसांसाठी इशारा

    मराठवाड्याला गारपिटीनं झोडपलं, तिघांचा अंत; शेती, फळबागांचं नुकसान, पुढील 2 दिवसांसाठी इशारा

    मराठवाड्याला गारपिटीने झोडपले असून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाल्यामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे तीघांचा मृत्यू झाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाल्यामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर अंगावर वीज कोसळल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला. पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपात पाऊस होईल, असा अंदाज जिल्हा कृषी हवामान केंद्राने व्यक्त केला आहे.

    मराठवाड्याच्या काही भागाला सोमवारी अवकाळी पावसाने झोडपले. दुपारी वादळासह गारपीट आणि पाऊस झाला. पावसामुळे भाजीपाला, फळबागा आणि शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाने जिल्हानिहाय नुकसानीचा प्राथमिक माहिती अहवाल जाहीर केला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोडापूर (ता. गंगापूर) येथे शेतवस्तीवर राहणारे अशोक नंदू म्हस्के (वय २२) या तरुण शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील मगरवाडी (ता. अंबाजोगाई) येथील सचिन मधुकरराव मगर (वय ३५) यांचा अवकाळी पावसात शेतात वीज पडून मृत्यू झाला. ढोरवाडी (ता. वडवणी) येथील अभिमन्यू पांडुरंग नलभे (वय ३६) यांचा सायंकाळी वीज पडून मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातील परतूर येथील शेख मुख्तार शेख अख्तर कुरेशी यांचा एक बैल वीज पडून दगावला असल्याचे तहसील कार्यालयाने सांगितले. परभणी जिल्ह्यातील कोरवाडी (ता. जिंतूर) येथील समाधान सुदाम कोंडाळ यांच्या शेतातील गोठ्यावर वीज पडून गाय आणि वासराचा जळून जागीच मृत्यू झाला.

    छत्रपती संभाजीनगर तालुक्यासह जिल्ह्यातील सिल्लोड, खुलताबाद, फुलंब्री, पैठण तालुक्यातील अनेक गावात जोरदार पाऊस झाला आहे. खुलताबाद तालुक्यात वादळामुळे लग्न सोहळ्यात धांदल उडाली. काही ठिकाणी वाऱ्यामुळे मांडव पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वैजापूर तालुक्यातील शिऊर, परसोडा भागात पाऊस झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची कांदे झाकण्यासाठी धावपळ उडाली होती. पैठण तालुक्यातील बिडकीन, चितेगाव, वडजी परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. गंगापूर तालुक्यातील लासूर बाजार समितीत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तिथे पावसामुळे धान्याची पोती भिजली आहेत. वाळूज-पंढरपूर भागात गारपीट आणि पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. या भागात मोठ्या आकाराच्या गारा पडल्या आहेत. शेकटा परिसरात वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर, रोहिलागड परिसरात मोठा पाऊस झाला आहे.

    दरम्यान, लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. लातूर शहरात सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. रेणापूर शहरात वीजपुरवठा खंडीत झाला होता. केज तालुक्यात चिंचोली माळी, हदगाव, डोका, सारुकवाडी परिसरात गारांसह अवकाळी पाऊस पडला आहे.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed