• Wed. Jul 22nd, 2026

    शेतकऱ्यांना संकटकाळातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 22, 2026
    शेतकऱ्यांना संकटकाळातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

    पुणे, दि. २२ : हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रात होणाऱ्या प्रतिकूल परिणामामुळे शेतकरी अडचणीत आला आहे; शेतकऱ्यांना संकटकाळातून सहकार्य करुन बाहेर काढणे ही राज्य शासनाची जबाबदारी असून त्याप्रमाणे राज्यशासन काम करीत आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय येथे शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिनानिमित्त आयोजित ‘देशी गोवंश प्रदर्शन व परिसंवाद’ कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

    यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, आमदार शंकर मांडेकर, महापौर मंजुषा नागपुरे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, कृषी सचिव परिमल सिंह, महाराष्ट्र राज्य कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल, कृषी आयुक्त सूरज पांढरे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन करुन मंत्री भरणे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कृषी क्षेत्राविषयी जिव्हाळा होता, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून त्या मार्गी लावून त्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांची भूमिका होती. त्यांनी देशी गाईचे महत्त्व लक्षात घेता त्यांच्या संवर्धनासाठी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या बळकटीकरणाकरिता निधी उपलब्ध करुन दिला होता. या केंद्राच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळत आहे, शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. देशी गाईचे संवर्धन करण्यासोबतच मोठ्या प्रमाणात प्रसार करावा.

    मंत्री भरणे म्हणाले, शेतकऱ्यांनी आधुनिक शेती केली पाहिजे, शेती उत्पादनात वाढ झाली पाहिजे, शेतमालाचा चांगला बाजारभाव मिळाला पाहिजे, ही कृत्रिम बुद्धीमत्ता धोरण (एआय) आणण्यामागची राज्यशासनाची भूमिका आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे 20 हजार कोटी रुपयाहून अधिक रकमेची मदत करण्यात आली, राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांची 40 हजार कोटी रुपयांची कर्जमुक्ती करण्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांचे 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांचे पूर्वीचे वीजबिल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
    कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, अवजारे मंजूर करण्यात आले आहेत, येत्या काळात शेतकऱ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. राज्यातील कृषी विद्यापीठाअंतर्गत विद्यार्थींनीसाठी नवीन वसतिगृहे बांधकाम करण्याचे काम सुरु आहे. ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक-२०२६’ च्या माध्यमातून सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येत आहे, या धोरणाअंतर्गत भूमिहीन महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार असून त्यांना विविध कृषी विषयक शासकीय योजनाचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद योजना राबविण्यात येत आहे, असेही मंत्री भरणे म्हणाले.

    श्री. मांढरे म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार शेतकरी सक्षमीकरणाच्यादृष्टीने पशुधन, आधुनिक बायोटेक्नोलॉजी, यांत्रिकीकरण, विपणन अशा बाबींचा समावेश करून कृषी विभागाचे सर्वसमावेश नवीन बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. कृषी क्षेत्रात बदल घडवून आण्याकरिता कृषि विद्यापीठ सर्व संबंधित विभाग, विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

    कुलगुरु डॉ. खर्चे म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या बळकटीकरणासाठी ७२ कोटी रूपयाचा निधी उपलब्ध करून दिला; आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही या केद्रांकरिता ५६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अन्न सुरक्षा, हवामान बदल, पर्यावरण संरक्षणाच्यादृष्टीने देशी गोवंश संवर्धन महत्वपूर्ण आहे. येत्या काळात हे कार्य जागतिक पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असेही डॉ. खर्चे म्हणाले.
    अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे शास्त्रज्ञ गोपाल सुतरिया म्हणाले, बन्सी गीर गोशाळेच्यावतीने देशातील सुमारे ८ लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. गाईच्या शेणाचे महत्त्व लक्षात घेता विविध संशोधन करुन ६५ प्रकारच्या पिकाला लाभ झाला आहे. शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे, परिणामी शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वाटचाल करीत आहे.

    कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची संदेश देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘शाश्वत देशी गोपालन’ मार्गदर्शक पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. तसेच राज्यातील १४ गो-पालकांचा सत्कार करण्यात आला.
    कार्यक्रमास महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य शशीकांत तरंगे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडखे, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष शेखर मुंदडा, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अमोल नलावडे, अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने, कृषी व पशु सखी, महिला बचत गट सदस्य, शेतकरी, गोपालक, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed