• Thu. Mar 12th, 2026
    ठाकरेंनी कौतुक केलेली यंत्रणा मिशन मोडवर; उद्धवसेनेच्या पराभवासाठी भाजपचे ‘ते’ १०८ जण राबणार

    Mumbai BJP: लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभेत दणदणीत विजय मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षानं आता मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभेत दणदणीत विजय मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षानं आता मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मुंबई महापालिकेवर गेल्या ३ दशकांपासून वर्चस्व आहे. याच वर्चस्वाला शह देण्यासाठी भाजपनं रणनीती आखली आहे. २०१७ मध्ये भाजपनं स्वबळावर लढत शिवसेनेला कडवी लढत दिली होती. पण शिवसेना सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरली. आता पक्षफुटीनंतर ठाकरेंची घटलेली ताकद आणि शिंदेंच्या शिवसेनेचं मुंबईत असलेलं मर्यादित वर्चस्व पाहता भाजपला मोठी संधी आहे. त्याचाच फायदा घेण्यासाठी भाजपनं आतापासूनच फिल्डिंग लावली आहे.

    नाशिकमध्ये झालेल्या शिवसेना उबाठाच्या निर्धार शिबिरात उद्धव ठाकरेंनी भाजपच्या बूथ व्यवस्थापनाचं कौतुक केलं. भाजपच्या संघटनात्मक रचनेबद्दल ठाकरे सविस्तर बोलले. आता ठाकरेंना पराभूत करण्यासाठी हीच यंत्रणा कामाला लागली आहे. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी ३ मंडल अध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे. १०० बूथमागे १ मंडल अध्यक्ष या सुत्रानुसार मुंबईत ३६ विधानसभा मतदारसंघांसाठी १०८ मंडल अध्यक्ष निवडले जाणार आहेत. मुंबई प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत छाननी करण्यात आलेल्या मंडल अध्यक्षांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
    Uddhav Thackeray: मुद्दाम फोटो आणलाय! ठाकरेंनी भाजपच्या गोटातील खडानखडा माहिती सांगितली; तपशील दिला कोणी?
    मुंबई भाजपमध्ये पन्ना प्रमुख, बुथ प्रमुख, वॉर्ड अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष अशी चढती रचना आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाला ऐतिहासिक यश मिळाल्यानं निकालानंतर जोरदार इन्कमिंग झालेलं आहे. त्यामुळे एका विधानसभा मतदारसंघामागे ३ मंडल अध्यक्ष पदं तयार करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या पदांवर ३५ ते ४५ वर्ष वयोगटातील तरुणांना आणि महिलांना संधी दिली जाईल.
    Uddhav Thackeray: ठाकरेंकडे 55 हजारांची फौज तयार, आता मुंबईत लढाई आरपार; फिल्डींग लागली, तरीही अडचण का वाढली?
    मंडल अध्यक्षांच्या निवडीसाठी भाजपनं प्रत्येक लोकसभा मतदारसंघात निरीक्षक पाठवले होते. त्यांनी एका जागेसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा ३ नावांची शिफारस केलेली आहे. १६ एप्रिलपर्यंत ही नावं बंद पाकिटात भरुन कोअर कमिटीकडे पाठवण्यात आली. कोअर कमिटीनं नावांची छाननी केली आहे. मंडल अध्यक्ष पदावर नियु्क्ती करताना काही प्रमुख निकष असणार आहेत. इच्छुक व्यक्तीची सामाजिक, भौगोलिक पार्श्वभूमी, त्यानं पक्षासाठी दिलेलं योगदान यांचा विचार होईल.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed