• Fri. Mar 13th, 2026
    ‘भाजपमध्ये गेलो म्हणून शक्तीपीठ महामार्गाला माझा विरोध…,’ संजय घाटगेंनी स्पष्ट केली भूमिका

    Edited byविमल पाटील | Authored by नयन यादवाड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 17 Apr 2025, 8:00 pm

    Sanjay Ghatge on Shaktipith Mahamarg in Kolhapur : जमिनीचा मालक बदलला म्हणजे जमिनीचा गुणधर्म बदलत नाही. तसं शेतकऱ्यांच्या हितासाठी आजपर्यंत आम्ही लढत आलो आहोत. शक्तीपीठ महामार्गाला माझा विरोध कायम राहील, असे माजी आमदार संजय घाटगे म्हणाले आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नयन यादवाड, कोल्हापूर : जमिनीचा मालक बदलला म्हणजे जमिनीचा गुणधर्म बदलत नाही. तसं शेतकऱ्यांच्या हितासाठी आजपर्यंत आम्ही लढत आलो आहोत. शक्तिपीठ महामार्ग संदर्भात जे शेतकरी अल्पभूधारक आहेत. ज्यांची गुरंढोरं आणि घरचे त्या जमिनीवर अवलंबून आहेत, त्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ द्यायचं नाही, असं माझं धोरण आहे. ते कायम राहील आणि वेळच आली तर मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना भेटून पटवून देईल. मात्र शक्तीपीठ महामार्गाला माझा विरोध कायम राहील कोणत्याही परिस्थितीत लढा बंद करणार नाही, असे कागलचे माजी आमदार संजय घाटगे (Sanjay Ghatge) यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. मी माझ्यासाठी काहीही मागितलेलं नाही आणि मागणार ही नाही, असेही संजय घाटगेंनी नमूद केले.

    राज्यात राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरातील कागल तालुक्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला. मंगळवारी १५ एप्रिलला कागलचे माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी शिवसेना ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती घेतले आणि भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह पुत्र अंबरिशसिंह घाटगे आणि कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश केला. यानंतर कोल्हापुरातील स्थानिक नेत्यांकडून संजय घाटगेंवर टीका करण्यात आली. मात्र आज कोल्हापुरात दाखल होतात संजय बाबा घाटगे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

    संजय घाटगे म्हणाले, भाजप कार्यकर्त्यांचा जाण राखणारा पक्ष आहे. ते माझ्या कार्यकर्त्यांना न्याय देतील, अशी मानसिकता माझी झाल्याने मी भाजपमध्ये प्रवेश केला. कोणतीही सार्वत्रिक निवडणूक लढवणार नाही हे मी यापूर्वी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे मी माझ्या स्वतःसाठी काहीही मागितलेलं नाही आणि मागणार ही नाही, असेही घाटगे यावेळी म्हणाले आहेत.

    ‘शक्तीपीठ महामार्गाला माझा शंभर टक्के विरोध’

    राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील मोठा विरोध आहे. यामध्ये संजय घाटगे यांचा देखील विरोध होता. मात्र भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या विरोधाची धार कमी होईल, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याला देखील संजय बाबा घाटगे यांनी उत्तर दिलं असून, राज्यात मला माहित नाही मात्र कागल आणि कोल्हापूर मधून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला माझा शंभर टक्के विरोध असणार आहे. येथील शेतकरी अल्पभूधारक आहे चार चार पिढ्या कष्ट करून जमीन लेव्हल करून ही उपजाव केली आहे. हे सर्व करून शेतकरी आज दोन घास सुखाचे खात आहेत. यामुळे ही शेती शक्तीपीठ महामार्गामध्ये जाऊ नये यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न आणि लढा सुरूच असेल, असेही यावेळी संजय बाबा घाटगे म्हणाले आहेत.

    ‘उद्धव ठाकरे साहेब हे सज्जन माणूस’

    दरम्यान संजय घाटगेंनी घेतलेल्या निर्णयानंतर त्यांनी हा निर्णय का घेतला याबाबत आपली खदखद देखील व्यक्त करत आम्ही केलेल त्याग काही लोक सोयीनुसार विसरत आहेत. मी सहा विधानसभा निवडणुका लढवल्या मात्र काही लोकांनी पाठ फिरवली. जिल्ह्यातील दोन्ही मोठी गट दुसऱ्या नेत्यांच्या पाठीशी राहायचे मात्र माझ्या पाठीशी कोणीही आलं नाही. काहीजण आम्हाला बोडखा बाजार समजायची मात्र जनतेने आम्हाला उचलून धरल. आता टाहो फोडून काव काव करत ओरडणारे कावळे एकदा तरी मला समर्थन द्यायला आले होते का ? त्यांनी पक्षाची निष्ठा आम्हाला शिकवू नये अस म्हणत संजय घाटगे यांनीच विरोधकांना खडसावल आहे. मात्र उद्धव ठाकरे साहेब हे अत्यंत चांगले आणि सज्जन माणूस आहे मी भाजपमध्ये जात असताना काही कल्पना दिली नाही तिथे जाऊन मी काय सांगू, असा देखील मला प्रश्न होता. कोणाच्याही बद्दल माझ्या मनात द्वेष नाही, असेही संजय घाटगे म्हणाले आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed