• Mon. Mar 16th, 2026

    आदिवासी आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी नियंत्रण समिती – डॉ. अशोक उईके – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 31, 2025
    आदिवासी आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी नियंत्रण समिती – डॉ. अशोक उईके – महासंवाद

    Ø  आदिवासी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात अत्याधुनिक सुविधा

    Ø  शिक्षण क्षेत्रातील विविध संस्थाचे मार्गदर्शन

    Ø  नविन शिक्षण धोरणानूसार उपक्रमांची आखणी

    Ø  रविंद्र ठाकरे यांनी सुरू केलेले उपक्रम कायम राहणार

    नागपूर, दि. ३१ :   अतिदुर्गम भागात राहणारा आदिवासी समाज आपल्या संस्कृतीचे संवर्धन करत असला तरी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. यासाठी शिक्षणाच्या सर्व सुविधा आश्रमशाळांच्या माध्यमातून त्यांच्या पर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. आश्रमशाळा तसेच वस्तीगृहामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये वाढ करतांनाच आश्रमशाळांचा दर्जा वाढविण्यासाठी नियंत्रण समिती तयार करण्यात येणार असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईक यांनी केली.

    वनामती येथील सभागृहात आदिवासी विकास विभागातर्फे नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण तसेच यासाठी सहाय्य करणाऱ्या संस्थांचा गौरव समारंभ आदिवासी विकास मंत्री यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

    कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री शंकरबाबा पापळकर होते. यावेळी अतिरिक्त आदिवासी उपायुक्त रविंद्र ठाकरे, उपायुक्त दिगंबर चव्हाण, प्रकल्प अधिकारी रंजित यादव (गडचिरोली), कुशल जैन (अहेरी), दिपक हेडाऊ (वर्धा), विकास राचेलवार (चंद्रपूर), प्रविण लाटकर (चिमूर), निरज मोरे (भंडारा), उमेश काशीद (देवरी), उपसंचालक डॉ. पुरूषोत्तम मडावी, शिवराम भलावी, दिनेश शेराम, डॉ. गोडवते, अधिक्षक अभियंता उज्वल डाबे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. पद्मश्री मिळाल्यानंतर शंकरबाबा पापळकर व रविंद्र ठाकरे यांचा सेवानिवृत्तीनिमीत्त गौरव करण्यात आला.

    आदिवासींच्या जिवनात आर्थिक व सामाजिक परिवर्तना सोबतच संपूर्ण समाज शैक्षणिकदृष्ट्या प्रगत होईल यादृष्टीने काम करण्याची आवश्यकता असून आदिवासी विभागाची अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी मागिल चार वर्षात विविध उपक्रमांच्या माध्यमातून या समाजाच्या सर्वांगिन विकासाला प्रोत्साहन दिले आहे. आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी यासाठी बोलका वर्ग, ब्रायटर माईंड आदी शैक्षणिक उपक्रम राबविले. याउपक्रमामुळेच अनेक विद्यार्थी गुणवत्त यादीत येवू शकले. त्यांनी सुरू केलेले सर्व उपक्रम यापुढेही कायम सुरू राहतील असा विश्वास आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांनी व्यक्त केला.

    आदिवासी विभागाच्या अंतर्गत असलेल्या सर्व आश्रमशाळा व वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधांमध्ये आमुलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. नविन अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीचे शैक्षणिक साहित्य पुरविणे आवश्यक आहे. वस्तीगृहामध्ये असलेल्या सोयी व सुविधा कशा वाढविता येईल यासाठी प्रत्येक आश्रमशाळेसाठी नियंत्रण समिती तयार करण्यात यावी व ही समिती नियमीत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधेल तरच प्रत्येक आदिवासी मुलाला शैक्षणिक सुविधा उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आदिवासी आश्रमशाळांच्या शैक्षणिक उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या विविध संस्था व व्यक्तींचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.

    पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी आदिवासी समाज हा प्रमाणिक व मेहनती असल्यामूळे जंगलांच्या संवर्धनासाठी महत्वाची भुमिका बजावत आहे. आदिवासी भागात शिक्षणाच्या सुविधा निर्माण करून दर्जेदार शिक्षण मिळेल यासाठी विभागाने पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त केली. आदिवासी भागातील प्रत्येक मुलगा शाळेत येईल. यासाठी  उपाययोजना कराव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले.

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *