Raj Thackeray Gudipadwa Melava Speech : शिवतिर्थावर राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी गंगा नदी, मुंबईतील मिठी नदीचं प्रदूषण याकडे लक्ष वेधलं.
महाकुंभमेळ्यात धर्माच्या नावाखाली गंगा नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालं. गंगेसह राज्यातील अनेक नद्या प्रदूषित झाल्या आहेत. त्या प्रदूषित झाल्या नाहीत तर त्या आपण केल्या असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
मुंबईत पाच नद्या होत्या, त्यापैकी चार आपण मारल्या –
‘मुंबईत पाच नद्या होत्या, अनेकांना हे माहितही नसेल. त्यातल्या चार मेल्या, मेल्या म्हणजे मारल्या. सांडपाणी, झोपडपट्ट्या यामुळे त्या चार नद्या मेल्या आणि आता पाचवी नदी मरायला आली आहे, ती मिठी नदी आहे. काल शूट केलेली मिठी नदी. अगोदरचं देखील दाखवत नाही, काल शनिवारी शूट केलेली मिठी नदीची अवस्था दाखवतो आहे, ती बघा’, असं म्हणत राज ठाकरे यांनी मिनिटभराचा मिठी नदीच्या भीषण परिस्थितीचा व्हिडिओ दाखवला.
Raj Thackeray Speech : ‘लाव रे तो व्हिडीओ’, राज ठाकरेंनी भर सभेत VIDEO दाखवले, म्हणाले, ‘कुंभमेळ्याचा अपमान, अरे मुर्ख…’
‘या सगळ्या नद्या आपल्या लोकांनी मारुन टाकल्या. दरवर्षी मुंबई महानगरपालिका म्हणणार आम्ही मिठी नदी साफ केली असं सांगतं, ही साफ केलेली नदी आहे? जोपर्यंत आजूबाजूची वस्ती हटणार नाही, तोपर्यंत या नद्या कधीही साफ होणार नाहीत. आपल्या सगळ्या नद्यांमध्ये केमिकल भरलेली आहेत. आपलं पोल्यूशन कंट्रोल बोर्ड काय करतं? उद्योग-धंद्यांना प्रोत्साहन देणार, नंतर ते यांना प्रोत्साहन देतात. जे-जे नैसर्गिक स्त्रोत आहेत ते बंद करायचे, त्यावर बोलल्यानंतर तुमचा धर्म आडवा येणार, धर्माच्या गोष्टी मला या लोकांनी कोणी सांगू नये, काही गोष्टी आपल्यात आपण बदलल्या पाहिजेत.’
अंत्यसंस्कार लाकडावर नाही, तर विद्युतदायिनीवर झाले पाहिजेत –
‘आपल्याकडे महानगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हापरिषदा आल्या की देशभरात भिंती रंगवल्या जातात, बोर्ड लावले जातात झाडं जगवा, झाडं वाचवा. देशात हिंदूचे अंत्यसंस्कार लाकडावर होतात. लाकूड येतं कुठून? देशातील जंगलतोड झाल्याशिवाय लाकूड येणारच नाही. याला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक विद्युतदायिनी आल्या आहेत. पण काही जण असतात कर्मट, विद्युतदायिनी नाही, आम्ही आमच्या परंपरेनुसार करणार म्हणतात. देशभरात विद्युतदायिनी झाल्या पाहिजेत, तरच लाकूड वाचेल, जंगल वाचेल,’ असं राज ठाकरे म्हणाले.

