Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल भागात गायरान जमिनींवरील अतिक्रमण काढण्याच्या प्रयत्नात दगडफेकीची घटना घडली असून दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यामुळे जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे बघायला मिळतंय.
प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रकल्प उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महापालिकेला हर्सूल येथील गट क्रमांक २१६ व २१७मधील अडीच एकर जागा दिली आहे, परंतु या जागेवर अतिक्रमण असल्यामुळे ते हटवण्यासाठी पालिका प्रशासनाने तेथील नागरिकांशी संवाद साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने सोमवारी कारवाई करून १८० अतिक्रमणे पाडन टाकली.
यावेळी नागरिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला होता, नागरी मित्र पथकाने तो हाणून पाडला. पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२५ मार्च) सकाळी साडेअकराला पालिकेचे अतिक्रमण हटाव पथक अश्विनी कोथळकर यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटविण्यात आले होते त्या ठिकाणी पोहोचले. नागरिकांनी आपले साहित्य काढून घ्यावे व जागा रिकामी करावी, जागेचे सपाटीकरण करायचे आहे असे आवाहन ध्वनिक्षेपकावरुन पालिकेच्या पथकातील कर्मचारी करीत होते.
IPL 2025: आयपीएल स्पर्धेत बेटिंग, मुंबई पोलिसांचा सहभाग, अंबादास दानवे यांच्या दाव्याने खळबळएवढ्यात एक जमाव या पथकाच्या दिशेने धावून आला आणि त्याने दगडफेक सुरू केली. दगडफेकीत नागरी मित्र पथकातील माजी सैनिक गजानन चितळे यांचे डोके फुटले, रामेश्वर निकम यांच्या पायाला मार लागला. जमाव चालून येत असल्याचे लक्षात येताच पथकाने काढता पाय घेतला. त्यानंतर हसूल पोलिस ठाण्यात जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर शहरावरील पाण्याचे संकट कायम आहे. ३८ तासांचा शटडाऊन संपल्यावर ९०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी निखळली, या जलवाहिनीची दुरुस्ती अद्याप झालेली नसताना फारोळा फाटा येथे १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा एअर व्हॉल्व्ह फुटला, त्याच्या दुरुस्तीला बारा तास लागले. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला. दरम्यान शहरातील अनेक भागांमध्ये आठ दिवसांपासून निर्जळी आहे. नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

