• Fri. Mar 6th, 2026
    बाईकला HSRP नंबरप्लेटसाठी ४५० रुपये, नऊ राज्यांत महाराष्ट्रापेक्षा कमी दर? सरनाईक म्हणाले…

    Pratap Sarnaik on HSRP Number Plate : महाराष्ट्रातील हे दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहेत, असे सरनाईक म्हणाले. तर, नऊ राज्यांतील दर महाराष्ट्रापेक्षा कमीच असल्याचा दावा आमदार परब यांनी केला.

    महाराष्ट्र टाइम्स

    मुंबई : महाराष्ट्रामध्ये दुचाकी वाहनांसाठी एचएसआरपी (HSRP) बसविण्यासाठी रुपये ४५० हा दर निश्चित करण्यात आला असल्याचे सांगून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी एचएसआरपी संदर्भात अन्य राज्यातील दराची माहिती दिली. त्याचबरोबर तीन चाकी आणि चारचाकीसाठी वेगवेगळे दर असल्याचेही त्यांनी सांगितले.

    केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९च्या तरतुदीनुसार, जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत झालेल्या वाहनांना एचएसआरपी बसवण्याची योजना आखण्यात आली आहे. परंतु, याविषयी जाणीवपूर्वक गैरसमज पसरविण्यात येत असून वाहनधारकांची फसवणूक झाल्यास त्याची तातडीने तक्रार करावी, असे आवाहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत केले.

    जुन्या वाहनांना लावण्यात येणाऱ्या एचएसआर प्लेटसंदर्भात आमदार अनिल परब यांनी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. ‘आत्तापर्यंत १६ लाख ५८ हजार ४९५ वाहनांनी एचएसआरपीसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी ३.७९ लाख वाहनांवर उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्यात आल्या आहेत. हे काम वेगाने व्हावे यासाठी निविदा प्रक्रियेत कार्यक्षमतेसाठी तीन विभाग तयार करण्यात आले असून, वेगवेगळ्या क्लस्टरच्या माध्यमातून कामाचे नियोजन आखण्यात आले आहे,’ असे सरनाईक यांनी सांगितले.
    HSRP Number Plate : मुदत एप्रिलची, तारीख मे महिन्याची! एचएसआरपी नंबरप्लेटबाबत गोंधळ, दंड भरावा लागण्याची भीती, तोडगा काय?
    महाराष्ट्रातील हे दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहेत, असे सरनाईक म्हणाले. तर, नऊ राज्यांतील दर महाराष्ट्रापेक्षा कमीच असल्याचा दावा आमदार परब यांनी केला. यावेळी उच्च सुरक्षा नंबर प्लेटच्या दरांमध्ये विसंगती असल्याचे आरोप होत आहेत. तरी सर्व पुरावे तपासून घेऊन योग्य ती चौकशी केली जाईल. तथापि दरामध्ये बदल होणार नसल्याचेही परिवहन मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

    सामाजिक संदेश मराठी भाषेत

    दुसरीकडे, येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यामध्ये परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावर लिहिले गेलेले सामाजिक संदेश हे मराठी भाषेत असायला हवेत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत. महाराष्ट्रातील जनतेला अधिक उपयुक्त माहिती मिळेल आणि मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होईल, हा यामागील उद्देश आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed