मुंबई महापालिका निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महापालिका निवडणुका आता ऑक्टोबर नंतरच होतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांची आणि राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडल्याची माहिती आहे. यावेळी निवडणुकीबाबत चर्चा झाली. सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तरी मुंबई महापालिकेच्या निवडणुका या ऑक्टोबरनंतरच लागणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.
मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या रखडल्या आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. तर मुंबई महापालिका निवडणूक ही आणखी एका कारणासाठी रखडली आहे. महाविकास आघाडीने ठरवलेली वॉर्ड रचना महायुती सरकारने रद्द केली आहे. त्यामुळे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आहे. वॉर्ड रचना ठरवण्याचा अधिकार हा सरकारला आहे की निवडणूक आयोगाला, याबाबत निकाल येणं अपेक्षित आहे. या प्रकरणांवर येत्या 4 मे ला सुनावणी होणार आहे. यावेळी निकाल जाहीर झाला तरी त्याच महिन्यात प्रशासनाला निवडणुका घेणं शक्य नसल्याची माहिती समोर येत आहे.
Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा निर्णय, मतदान ओळखपत्र आधारकार्डसोबत लिंक होणार
निवडणूक नेमकी कधी होणार?
महापालिका अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी यांच्यात पालिका निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा झाली. निवडणुकीची तयारी करण्यासाठी, आढावा घेण्यासाठी तसेच आरक्षण सोडती, हरकती मागवणे, यादी तपासणे यासाठी प्रशासनाला जवळपास 100 दिवसांचा कालावधी लागतो, असं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे 4 मे ला निकाल जाहीर झाला तरी प्रशासनाला 100 दिवसांचा कालावधी हा तयारी करण्यासाठी जाऊ शकतो. याशिवाय मे महिन्यानंतर पावसाळा सुरु होईल. पावसाळ्यात मतदान घेणं शक्य नाही. त्यामुळे दिवळीनंतर कदाचित ऑक्टोबर महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे निकाल लांबणीवर गेला तर निवडणुका आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

