• Mon. Mar 9th, 2026

    गाड्या ओढून नेल्या अन् पेटवल्या; पोलिसांनी आम्हालाच शिव्या दिल्या; नागपुरातील महिलांचा संताप

    गाड्या ओढून नेल्या अन् पेटवल्या; पोलिसांनी आम्हालाच शिव्या दिल्या; नागपुरातील महिलांचा संताप

    Nagpur Violence: राज्यात औरंगजेबच्या कबरीवरुन वाद पेटलेला असताना काल नागपुरात हिंसाचार उफाळून आला. चिटणीस पार्क परिसरात दोन गट आमनेसामने आले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर दगडफेक झाली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नागपूर: राज्यात औरंगजेबच्या कबरीवरुन वाद पेटलेला असताना काल नागपुरात हिंसाचार उफाळून आला. चिटणीस पार्क परिसरात दोन गट आमनेसामने आले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर दगडफेक झाली. यानंतर आसपासच्या परिसरात तणाव निर्माण झाला. जमावानं पोलिसांवर दगडफेक करत वाहनं पेटवली. त्यात लोकांचं प्रचंड नुकसान झालं. अनेक निष्पाप नागरिकांना या हिंसाचाराचा फटका बसला.

    महाल परिसरात राहणाऱ्यांनी काल रात्रीच्या सुमारास घडलेल्या हिंसाचाराच्या कटू आठवणी सांगितल्या. हल्ला झाला त्यावेळी पोलिसांनी प्रतिसादच दिला नाही. त्यांनी वेळीच आमच्या परिसरात धाव घेतली असती, तर आमचं नुकसान टळलं असतं, असं म्हणत स्थानिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. परिसरातील अनेकांच्या गाड्या जमावानं जाळल्या. त्यावेळी रहिवासी त्यांच्या घरात जीव मुठीत घेऊन बसले होते.
    Nagpur Violence: नागपुरात हिंसाचार, घटनास्थळी सापडले आयडी कार्ड; स्थानिकांचा खळबळजनक दावा, घटनाक्रम सांगितला
    ‘जमावातील अनेकांच्या हातात तलवारी होत्या. त्यांनी घरांवर दगड, विटा फेकून मारल्या. दुचाकी एकत्र करुन पेटवून दिल्या,’ अशा शब्दांत एका महिलेनं कालचा घटनाक्रम कथन केला. ‘जमावानं आमच्या गाड्या जाळल्या. प्रत्येक गाडी घरातून अक्षरश: ओढून ओढून नेली आणि पेटवून दिली. कपड्यांच्या चिंध्या बॉक्समधून काढून त्या गाड्यांवर टाकल्या आणि वाहनं पेटवून दिली’, अशी आपबिती दुसऱ्या महिलेनं सांगितली. ‘आमच्या घरावर दगड पडले. जमावानं दगड फेकून मारले. आमच्या परिसरातील सगळ्या लाईट फोडल्या,’ हे सांगताना महिलाच्या हातात तिच्या घरावर मारण्यात आलेला दगड होता.

    ‘दीड तासापासून आम्ही पोलिसांना फोन करत होतो. पण पोलिसांचं एकही पथक इथे येण्यास तयार नव्हतं. एक पोलीसदेखील इथे फिरकला नाही. आम्हाला सगळीकडे लक्ष ठेवावं लागतं अशी उलट उत्तरं पोलिसांनी दिली. अखेर नाईलाज म्हणून वस्तीतले लोकच बाहेर आले. तेव्हा पोलिसांनी आम्हालाच शिव्या दिल्या. आम्हाला घरात जायला सांगितलं. मग अशा परिस्थितीत आम्ही काय करायचं? आमची काय चूक होती?,’ असे प्रश्न एका महिलेनं हतबलपणे विचारले.
    Nagpur Violence: हिंदू-मुस्लिम वरुन राजकारण नको! कुठे जाणार हे करुन? उद्विग्न तरुण भडाभडा बोलला, डोळ्यात पाणी
    पोलिसांनी आमच्या फोनला वेळीच प्रतिसाद दिला असता, तर मोठं नुकसान टळलं असतं, असं म्हणत एका स्थानिक रहिवाशानं पोलिसांचं अपयश अधोरेखित केलं. ‘रात्री १० पासून जमावाचा उपद्रव सुरु होता. मी स्थानिक पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सिंह यांंना फोन केला. त्यांनी प्रतिसादच दिला नाही. मग स्थानिक आमदारांना फोन केला. त्यांनी सिंह यांना फोन लावला. पण दरम्यानच्या तासाभरात हल्लेखोरांनी अगदी विशिष्ट घरांना लक्ष्य केलं. त्या घरांवरच हल्ले केले. हा जमाव अतिशय घाणेरडी भाषा वापरत होता. ती जाहीरपणे मी बोलूही शकत नाही. पोलीस वेळेवर आले असते तर नुकसान टळलं असतं, असं स्थानिकांनी सांगितलं.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed