Palghar News : जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळल्याने डहाणू तालुक्यात भीषण दुर्घटना घडली आहे. टाकीचा स्लॅब कोसळून मुली खाली पडल्याने दोन मुलींचा मृत्यू झाला आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चळणी ग्रामपंचायत हद्दीत सुकड आंबा- शिरसूनपाडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. या टाकीच्या परिसरात तीन मुली खेळत होत्या. याचदरम्यान तीनही मुली ३० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढल्या. मात्र याचदरम्यान टाकीचा स्लॅब कोसळल्याने दोन मुली थेट खाली पडल्या. ३० फूट उंचीवरून थेट खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघांचा जागीच मत्यू झाला आहे. तर एक मुलगी लॅबला अडकल्याने सुदैवाने तिचा जीव वाचला मात्र ती जखमी झाली आहे. तीनही मुलींना तातडीने सायवन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले त्यानंतर कासा येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र दोन मुलींचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तेथे घोषित केले.
Pune News : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; नशेत कार डिव्हायडरला ठोकली, दुधवाल्याच्या गाडीला जोरदार धडक अन् मग…
हर्षला रघु पागी (वय ११), संजना प्रकाश राव (वय १२) अशी अपघातात या दुर्घटनेतील मृत मुलींची नावे आहेत. रीना रशू फरारा (वय ११) ही मुलगी जखमी झाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मृत मुलींच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात उभारण्यात आलेला या पाण्याच्या टाकीचे काम हरेश बोरवेल कंपनीच्या ठेकेदारामार्फत हाती घेण्यात आले होते. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करावी आणि कठोर शिक्षा करण्याची मागणी मृत मुलींच्या कुटुंबीयांनी व स्थानिकांकडून केली जात आहे.

