Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये तापमानात सतत वाढत होताना दिसत आहे. दिवसभर उष्णतेची लाट आणि रात्री थंड वातावरण अशी परिस्थिती आहे. पुढील काही दिवसांत तापमान स्थिर राहण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान खाते पुढील ५ दिवसांसाठी कोणताही इशारा दिलेला नाही.
आठवड्यात 39 ते 41 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान
राज्यातील काही शहरांमध्ये तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे. सोलापूरमध्ये तर या आठवड्यात 39 ते 41 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेल्याचे बघायला मिळाले. काल पुण्यात देखील 39 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेल्याचे बघायला मिळाले. मागील काही दिवसांपासून पुण्यात अधिक उन्हाच्या झळा बसताना दिसत आहेत. पुढील काही दिवस पुण्यात तापमान स्थिर राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलाय.
उष्णता आणि उकाडा वाढणार
सांगलीमध्येही तापमानात वाढ होताना दिसतंय. काल 38 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमानाची नोंद झालीये. राज्यात पुढील ५ दिवसांसाठी कोणताही इशारा हा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला नाहीये. राज्यात आज सर्व जिल्हांमध्ये कोरडे वातावरण राहणार आहे. वातावरणात फार काही बदल होणार नाहीये. मागच्या आठवड्यात हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. उष्णता आणि उकाडा वाढणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.
पुढील पाच दिवस हवामान राहणार स्थिर
साताऱ्यात काल कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलीये. पश्चिम महाराष्ट्रात तापमानात सतत बदल होत आहे. पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. मुंबईमध्येही दुपारच्यावेळी उन्हाच्या झळा या अधिक तीव्र होताना दिसत आहेत. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे.

