Educational News: शालेय शिक्षण विभागाने ‘१०० शाळांना भेटी’ कार्यक्रम जाहीर केला असून त्याअंतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदार त्यांच्या मतदारसंघातील जवळच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.
हायलाइट्स:
- ‘१०० शाळांना भेटी’ चा कार्यक्रम जाहीर
- पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदारांची हजेरी
- विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची योजना
या भेटीदरम्यान लोकप्रतिनिधी, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव हे शिक्षण विभागाचे अधिकारी शाळेत जाऊन विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्याशिवाय शालेय शिक्षणमंत्री व शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासाठी ‘१०० शाळांना भेटी’ हा कार्यक्रमही आखण्यात आला आहे.
या कार्यक्रमांतर्गत मंत्री, उपमंत्री आणि अधिकारी यांनी जिल्ह्यातील १०० शाळांना भेटी देण्याचे नियोजन करायचे आहे. या भेटीदरम्यान हे अधिकारी शाळेतील कामकाज, शैक्षणिक दर्जा आणि इतर सोयीसुविधा यांचा आढावा घेतील. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमध्ये कसे प्रवेश घेतील, याबाबतही हे अधिकारी व मंत्री शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांच्याशी चर्चा करणार आहेत.
या भेटींदरम्यान शाळा इमारत, विद्यार्थ्यांसाठी खेळाच्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी, शालेय पोषण आहार यांचाही आढावा घेतला जाणार आहे. तसेच धोकादायक इमारत, अस्वच्छ किंवा पाण्याअभावी बंद शौचालये अशा समस्या आढळल्यास अधिकारी वर्ग तातडीने त्या सोडवण्यासाठी सूचना देतील. त्यामुळे शाळांमधील अनेक समस्या तातडीने निकाली निघण्याची शक्यता आहे.

