• Mon. Mar 9th, 2026
    संतोष देशमुख प्रकरणाची धग कायम, आता आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला; घटनेने खळबळ

    Buldhana Crime News : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाची धग कमी झाली नसताना बुलढाण्यातून हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

    Lipi

    अमोल सराफ, बुलढाणा : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाची धग कमी झाली नसताना बुलढाण्यातून हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील माजी सरपंच निलेश देशमुख यांच्या डोक्यात रॉड घालून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये देशमुख गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, निलेश विनायकराव देशमुख (वय ४२) हे बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील सुटाळा खुर्दचे माजी सरपंच आहेत. ते सप्तश्रृंगी नगरवाडीतील गौरव हॉटेल मध्ये येथे बुधवारी ५ मार्चला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास मित्रांसोबत होते. बाजूच्या कॅबिनमध्ये मयुर सिध्दपुरा, रोहित मगर आणि ज्ञानप्रकाश जांगीड हे तिघे बसलेले होते. यावेळी थुंकण्याच्या कारणावरुन मयुरने निलेश देशमुख यांच्यासोबत वाद घातला व शिवीगाळ केली. यानंतर निलेश हे आपल्या मित्रांसह घरी जात असताना तिघांनी त्यांचा पाठलाग केला. तर जी. एस. कॉलेजच्या गेट समोर पोहोचताच मयुरने निलेश देशमुख यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला. तर इतर दोघांनी त्यांना जबर मारहाण केली. यामध्ये देशमुख गंभीर जखमी झाले आहेत.

    पोलिसांनी असेही सांगितले की, निलेश देशमुख यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीची दखल घेत तिन्ही आरोपींविरोधात कलम ११८ (१). ३५१ (२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर हल्ला करणाऱ्यांमधील एका आरोपीला अटक केली आहे. मयूर सिद्धपुराला असे आरोपीचे नाव आहे. या हल्ल्यात जखमी झालेले निलेश देशमुखांवर खामगावमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    दोन्ही गटाकडून तक्रारी
    याप्रकरणी दोन्ही गटातील परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुख यांच्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी सुद्धा आपणास सरपंचसह तिघांनी मारहाण केल्याचा आरोप करत तक्रार दिली आहे. त्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, राज्यात हल्लेखोरांचे पेव उठल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस मारहाणीच्या घटनेत वाढ होत आहे. त्यामुळे पोलिसांचा धाक राहिला नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *