• Tue. Jul 28th, 2026
    Dharavi Redevelopment Project: आठ हजार झाडांची कत्तल? धारावी प्रकल्पासाठीच्या वृक्षतोडीचा प्रस्ताव प्राधिकरणापुढे

    Dharavi Redevelopment Project: सर्व झाडे किमान सहा फूट उंचीची आणि स्थानिक प्रजातींची असतील. तसेच या वृक्षांची सात वर्षे नियमित देखभाल करण्याची जबाबदारीही कंपनीने स्वीकारली आहे.

    धारावी प्रकल्प(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या धारावी पुनर्वसन प्रकल्पात आठ हजार झाडांची कत्तल होणार आहे. मात्र, महापालिकेकडून धारावी परिसरात उपलब्ध होणाऱ्या मोकळ्या जागेत ३० हजार झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव आज, मंगळवारी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पात बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात अन्य झाडांचे पुनर्रोपण पालघर जिल्ह्यातही करण्यात येणार आहे.

    धारावी पुनर्विकास प्रकल्पात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून धारावीतील पात्र झोपडपट्टीधारकांना मोफत घरे दिली जाणार आहेत. सुमारे साडेतीन लाख अपात्र झोपडपट्टीधारकांना भाडेतत्त्वावरील घरे दिली जातील. येथील झोपडीधारकांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यासाठी मुंबईतील काही जागांची चाचपणीही करण्यात आली. मात्र, त्यास विरोध झाला. या प्रकल्पाला गती दिली जात आहे. ती देताना धारावी पुनर्वसन प्रकल्पात झाडेही बाधित होत आहेत.

    धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १ हजार ६९३ झाडे बाधित होणार असून, त्यामध्ये ८७१ झाडे तोडण्यात येणार आहेत, तर ८२२ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. या बदल्यात पालघर जिल्ह्यातील चहाडे गावातील ९० एकर जागेवर २२,९०४ स्थानिक प्रजातींची झाडे लावण्याचे हमीपत्र कंपनीने महापालिकेला दिले आहे.

    Maharashtra TimesRamesh Mhatre Case: डॉक्टर मारहाणीचा तपास उपायुक्तांकडे द्या! नगरसेवक रमेश म्हात्रेप्रकरणी उच्च न्यायालयाचे आदेश
    महापालिकेच्या उद्यान विभागाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, धारावीतील शहर सर्वेक्षण क्रमांक २ (भाग) आणि ३ (भाग), सब प्लॉट-बी येथे पुनर्वसन इमारतींच्या बांधकामासाठी होणाऱ्या उत्खननामुळे आठ हजार झाडे बाधित होणार आहेत. मे २०२६ मध्ये झालेल्या संयुक्त पाहणीत संबंधित जागेवर १ हजार ९९८ जिवंत झाडे आणि ७ उन्मळून पडलेली झाडे, अशी एकूण २ हजार ००५ झाडे असल्याची नोंद करण्यात आली.

    मंजूर आराखड्यानुसार त्यापैकी १ हजार ६९३ झाडे प्रकल्पाच्या कामात अडथळा ठरत असल्याने त्यांना हटविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. कंपनीने दिलेल्या हमीपत्रानुसार, झाडे तोडल्यानंतर १५ दिवसांच्या आत २२ हजार ९०४ नवीन झाडांची लागवड केली जाईल.

    आणखी एक प्रस्ताव
    मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांसह खासगी पुनर्विकास आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी तब्बल १ हजार ४४३ झाडे बाधित होणार असून, त्यापैकी ९०२ झाडे थेट कापली जाणार आहेत. तर ५४१ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. या वृक्षतोडीच्या बदल्यात २१,६२५ झाडे लावली जाणार असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. हा प्रस्तावही मंगळवारी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे.

    पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढेंकडे तक्रार, भेटीनंतर रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

    प्रकल्पासाठी ‘बेस्ट’ आगाराचीही जागा
    धारावी पुनर्विकास प्रकल्पात ‘बेस्ट’ उपक्रमाच्या धारावी आगार आणि काळा किल्ला आगाराच्या जागेचाही वापर होणार आहे. या बस आगाराची जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि नवभारत मेघा डेव्हलपर्स प्रा.लि यांना हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका सभागृहातही मंजुरी दिल्यानंतर या कामाला आता गती दिली जात आहे. यामध्ये एकूण २.३५ एकर जागा ‘बेस्ट’ उपक्रमाची तर, उर्वरित जागा जिल्हाधिकारी अंतर्गत आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा