• Sun. Mar 15th, 2026

    Uday Samant: प्रत्येक जिल्ह्यात बचत गटाचे मॉल, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

    Uday Samant: प्रत्येक जिल्ह्यात बचत गटाचे मॉल, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

    Uday Samant: बचत गटांत सहभागी महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करून प्रत्येक जिल्ह्यात या बचत गटांचे मॉल राज्य सरकार उभारेल’, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

    महाराष्ट्र टाइम्स
    uday samant

    मुंबई : ‘राज्यात महिलांमध्ये उद्योजकता उपजतच असून, राज्याच्या विविध भागांत कार्यरत असणारे बचत गट हे याचे उत्तम उदाहरण आहे. बचत गटांकडून केवळ पापड-लोणची तयार करण्याची अपेक्षा ठेवणे आता आपण थांबवायला हवे. याच बचत गटांत सहभागी महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करून प्रत्येक जिल्ह्यात या बचत गटांचे मॉल राज्य सरकार उभारेल’, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. ‘आम्ही उद्योगिनी’ प्रतिष्ठानतर्फे आयोजित एकदिवसीय राज्यव्यापी उद्योजक महिला परिषदेच्या उत्तरार्धात ते बोलत होते.

    ‘राज्यातील अनेक मराठीजनांनी परदेशांत उद्योग सुरू केले आहेत. या सर्वांनी पुन्हा महाराष्ट्रात येऊन उद्योग सुरू करून या उद्योगाचा विस्तार करावा, यासाठी येत्या तीन महिन्यांत उद्योग मंत्रालयातर्फे उद्योगनुकूल एनआरआय धोरण लागू करण्यात येईल’, असे सामंत यांनी सांगितले. बचत गटांची क्षमता सांगण्यासाठी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे उदाहरण दिले. ‘रत्नागिरी जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर काही बचत गटांना हाऊसबोटी दिल्या. याद्वारे महिलांना रोजगार मिळाला. आज या व्यवसायाचा आढावा घेतल्यावर लक्षात आले की, या हाऊसबोटींसाठी पर्यटकांकडून ३०-३० दिवसांचे आगाऊ बुकिंग झाले आहे. या हाऊसबोटींच्या चालकही बचत गटातील महिलाच आहेत’, याकडे उदय सामंत यांनी लक्ष वेधले.
    माणिकराव कोकाटेंचा आज फैसला! धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर दबाव वाढला, काय निर्णय येणार?
    या परिषदेत दुपारच्या सत्रात संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि त्यांचे पुत्र शुभंकर कुलकर्णी यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दुसऱ्या सत्रात परदेशस्थ उद्योजक महिलांच्या यशोगाथा उपस्थित उद्योजक महिलांसमोर मांडण्यात आल्या. या परिसंवादात श्रिया जोशी (दुबई), श्रीकृपा वावगे (थायलंड), ललित महाडेश्वर (अमेरिका) आणि विजया पाटील (कोल्हापूर) या उद्योजकांनी सहभाग घेतला.
    आदिवासी विद्यार्थिनींना रात्रभर वसतिगृहात डांबले; आदिवासी विकासमंत्र्यांच्या यवतमाळातील धक्कादायक प्रकार
    परिषदेत ‘आम्ही उद्योगिनी’ पुरस्कारही प्रदान करण्यात आले. यामध्ये पत्रकारिता क्षेत्रासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वरिष्ठ पत्रकार यामिनी सप्रे यांना पत्रकारिता पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. यावेळी व्यासपीठावर थायलंड येथील विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्ष वैशाली उरुमकर, म्हैसकर फाऊंडेशनच्या सुधा म्हैसकर, जळगावच्या अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, चिली येथील उद्योजक गुस्ताव गोंझालेज आदी उपस्थित होते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed