• Sun. Mar 8th, 2026
    मुंबईतील ४१४ हॉटेलांना नोटीस; वरळी, प्रभादेवी, कुर्ला, भायखळ्यात ‘तंदूर’चा सर्वाधिक वापर

    Mumbai News: जानेवारी २०२५ पासून ते २७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ४१४ हॉटेलना नोटीस बजावून पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक आणि पीएनजीवरील शेगड्यांचा वापर करण्याचे वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वाधिक ‘तंदूर’चा वापर हा भायखळा, कुर्ला आणि वरळी, प्रभादेवी, महालक्ष्मीमधील हॉटेलमध्ये होत आहे.

    हायलाइट्स:

    • गेल्या दोन महिन्यांतील आकडेवारी
    • उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी
    • महापालिकेच्या पर्यावरण विभागाची कारवाई
    महाराष्ट्र टाइम्स
    tandoor AI

    मुंबई : लाकूड, कोळसा यांचा इंधन म्हणून उपयोग करणाऱ्या बेकरी, हॉटेल, उपाहारगृहे, उघड्यावर खाद्यपदार्थ विकणारे व्यावसायिक हेदेखील वायू प्रदूषणास कारणीभूत ठरतात. ही बाब लक्षात घेता पर्यावरणपूरक स्वच्छ इंधनाचा अवलंब करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून हॉटेलच्या हद्दीत विविध तंदूर खाद्यपदार्थ करून प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या हॉटेल मालकांनाही नोटीस बजावली जात आहे. जानेवारी २०२५ पासून ते २७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ४१४ हॉटेलना नोटीस बजावून पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक आणि पीएनजीवरील शेगड्यांचा वापर करण्याचे वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वाधिक ‘तंदूर’चा वापर हा भायखळा, कुर्ला आणि वरळी, प्रभादेवी, महालक्ष्मीमधील हॉटेलमध्ये होत आहे.तंदूर व्यवसायाची मुंबईतील संख्या अतिशय मोठी आहे. हॉटेल परिसरात अनेकदा हे व्यावसायिक दुय्यम दर्जाचे लाकूड, कोळसा किंवा मोडीत निघालेले फर्निचर यांचादेखील इंधन म्हणून उपयोग करतात. त्यातून घातक वायू बाहेर पडतात. ही बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने या प्रकारच्या प्रदूषणाची गांभीर्याने दखल घेतली आणि ९ जानेवारी २०२५ रोजी आदेश देत ८ जुलै २०२५ पर्यंत लाकूड व कोळसा आधारित सर्व हॉटेलना कायमस्वरूपी पर्यायी स्वच्छ इंधनाचा अवलंब करण्याचे आदेश दिले आहेत.

    त्यानुसार मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून हॉटेलांची तपासणी करून नोटीस बजावण्यात येत आहे. हॉटेलच्या हद्दीत तंदूरआधारित नॉन व्हेज, रोटी आदी पदार्थ केले जातात. ही संख्या मोठी आहे. त्यामुळे अशा हॉटेलांची तपासणी करून नोटीस बजावली जात असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

    मुंबईत १६ हजारांपेक्षा अधिक लहानमोठी हॉटेल असून आत्तापर्यंत ४१४ हॉटेलांना यासंदर्भात नोटिशी बजावल्या आहेत. यापैकी सर्वाधिक म्हणजे, ६१ नोटिशी महापालिकेच्या ई वॉर्डमधील भायखळ्यातील हॉटेलांना बजावल्या आहेत. तर वरळी, प्रभादेवी, महालक्ष्मी, लोअर परळ या जी दक्षिण वॉर्डमध्ये १०७ हॉटेलांना नोटिशी बजावल्या आहेत. तर कुर्ला वॉर्डमध्ये ६३, परळ, लालबाग या एफ दक्षिण वॉर्डमध्ये ४३ आणि सांताक्रूझ, खार, वांद्रे पूर्व या एच पूर्व वॉर्डमधील २६ हॉटेलांना नोटीस देण्यात आली आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed