Akola Woman Died In Honey Bee Attack: शेतात हरभरा काढण्यासाठी सारं कुटुंब गेलं. हरभरा काढण्यापूर्वी शेतात पुजा करण्यात आली, धूप-अगरबत्ती जाळण्यात आली आणि त्यानेच घात झाला. दोन लेकींच्या आईसोबत शेतात भयंकर घडलं.
अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथील शेतात रेश्मा पवार यांच्यावर एका कार्यक्रमा दरम्यान मधमाशांनी अचानक हल्ला केला. यामध्ये या तीस वर्षीय विवाहित महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
रेश्मा पवार यांचं कुटुंब काजळेश्वर शेत शिवारात हरभरा काढण्यासाठी गेले होते. हरभरा काढण्याआधी पूजेचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. पूजेसाठी अगरबत्ती – धूप असं पूजेच साहित्य होतं. पण, शेजारीच असलेल्या झाडावर मोह असल्याची माहिती या कुटुंबाला नव्हती. पूजा करून अगरबत्ती धुपबत्ती पेटवल्याने धूर झाला. संपूर्ण परिसरात धूर उडाल्याने शेजारी असलेल्या झाडावर बसलेले आग्या मोहाचे पोळ उठले, मोह उठल्याने मधमाशांनी उपस्थितांवर हल्ला केला. त्या हल्ल्यात रेश्मा पवार या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारा दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन लहान मुली, पती असा परिवार आहे. रेश्मा यांच्या जाण्याने चिमुकल्या मुली पोरक्या झाल्या आहेत, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
रेश्मा पवार यांच्यासह या हल्ल्यात दोन लहान मुली पुरुष व महिला असे सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये नियती अतिश पवार, महेक अतिश पवार, मीरा प्रकाश पवार (गंभीर), कावेरी प्रमोद राठोड , शेजल प्रमोद राठोड ,धनंजय प्रमोद राठोड , प्रकाश पांडू पवार आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशा प्रकारे नैसर्गिक आपत्तीने मृत्यूला सामोरे जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, मात्र रेश्मा पवार सारख्या तरुण महिलेचा अश्या प्रकारे करून अंत होणं हे दुर्दैवी आहे.

