• Thu. Mar 12th, 2026
    संजय जाधव यांना लाज-लज्जा काहीच नाही, ते कशातही….; रत्नाकर गुट्टेंची घणाघाती टीका

    Ratnakar Gutte on Sanjay Jadhav : विकासकामे होत असताना विरोधकांनी त्याला पाठिंबा द्यायचा सोडून तंगडे ओढण्याचे काम केले जात आहे. खासदार संजय जाधव यांना लाज वाटली पाहिजे तेही विरोध करतायत. गंगाखेड येथील उड्डाणपूलाला कितीही विरोध केला तरी उड्डाणपूलाचं काम पूर्ण करणार, असे थेट त्यांनी खासदार संजय जाधवांना दिला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    धनाजी चव्हाण, परभणी : विकासकामे होत असताना विरोधकांनी त्याला पाठिंबा द्यायचा सोडून तंगडे ओढण्याचे काम केले जात आहे. खासदार संजय जाधव यांना लाज वाटली पाहिजे तेही विरोध करत आहेत. खासदार जाधव यांना लाजलज्जा काहीच नाही, कशातही बोट घालत आहेत. उड्डाणपुलाला विरोध म्हणून त्यांनी नांदेड रेल्वे डीआरएम ऑफिसमध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत. पण त्यांनी कितीही विरोध केला तरी हा उड्डाणपूल होणार आहे. जसे विधानसभा निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र आले आणि मला पाडण्याचा प्रयत्न केला तरी मी २७ हजार मतांनी विजयी झालो आहे. तसेच या उड्डाणपुलाला किती जरी विरोध झाला तरी हा उड्डाणपूल मी पूर्ण करणार आहे, असा इशाराच त्यांनी खासदार संजय जाधवांना दिला आहे.

    रत्नाकर गुट्टेंनी मतदारसंघातील विकासकामांना विरोध पाहता खासदार संजय जाधवांना धारेवर धरले आहे. ते म्हणाले, चांगल्या गोष्टी करण्यासाठी मला कोणाचाही विरोध घ्यावा लागला तरी मी तो घेणार आहे. विकासकामांच्या आड कोणी येत असेल तर त्याचा बंदोबस्त करण्याइतपत ताकद जनतेने मला दिली असल्याचे म्हणत आमदार रत्नाकर गुट्टे यांनी थेट खासदार संजय जाधव यांना चॅलेंज दिले आहे.

    नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात शिवसेनेचे विशाल कदम यांनी तगडे आव्हान दिले होते. विशाल कदम यांना प्रचारार्थ खासदार संजय जाधव यांनी जीवाची रान केले आणि तेव्हापासून खासदार संजय जाधव आणि आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यामध्ये चांगलाच संघर्ष सुरू झाला आहे. आता विधानसभा निवडणुका संपन्न झाल्यानंतर गंगाखेड शहरात होणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामावरून जाधव आणि गुट्टे यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे.

    गंगाखेड शहराच्या मधोमध रेल्वे पटरी वरून मोठा उड्डाणपूल आमदार रत्नाकर गुट्टे यांनी मंजूर करून घेतला आहे. या उड्डाण पुलामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होणार आहे. त्याचबरोबर रेल्वे गेटच्या त्रासापासून गंगाखेड वासियांची सुटका देखील होणार आहे. पण आता याच उड्डाणपुलाच्या कामावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. गंगाखेड शहरातील काही लोकप्रतिनिधींनी या उड्डाणपुलाच्या कामाला विरोध केला आहे. काही जणांच्या तक्रारी लक्षात घेऊन उड्डाणपुलाच्या कामात बदल करून दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आली आहे. पण तरी देखील हा वाद मिटलेला नाही.

    आमदार रत्नाकर गुट्टे यांनी उड्डाणपुलाबद्दल म्हटले की, या उड्डाणपूलामुळे डोंगरातल्या ३६ गावांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर केवळ १० ते २० जणांचे नुकसान या उड्डाणपुलामुळे होणार आहे. या १० २० जणांच्या नुकसानामुळे तीस ते चाळीस हजार नागरिकांचा फायदा मी कसा काय रोखू शकतो. या उड्डाणपुलामुळे कोणाचाही वैयक्तिक नुकसान होणार नाही याची देखील काळजी घेतली गेली आहे. रेल्वे गेट बंद झाल्यानंतर नागरिकांना काय त्रास होतो हे मला माहित आहे.रस्त्याच्या लगत असणाऱ्या व्यापाऱ्यांना देखील या उड्डाणपुलचा त्रास नाही. असे असले तरी या विकास कामाला विरोध करण्यासाठी काही जण टंगडे ओढण्याचे काम करत आहेत.

    आमदार रत्नाकर गुट्टे आणि खासदार संजय जाधव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला या दोघांमधला संघर्ष अद्यापही सुरू झाले. आता गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील विकास कामावरून आमदार रत्नाकर गुट्टे आणि खासदार संजय जाधव आमने सामने आले आहेत. गंगाखेड शहरात होणाऱ्या या उड्डाण पुलाच्या कामावरूनही दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. हा संघर्ष आणखीन किती काळ चालेल हे आपल्याला पाहावे लागणार आहे. पण सध्या तरी दोघेही मागे हटण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed