• Mon. Mar 9th, 2026
    घरातून अचानक निघाला, फ्लाईटनं निघून गेला; तानाजी सावंतांचा लेक नेमका कुठे? बेपत्ता की अपहरण?

    माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याचा निनावी फोन कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला आल्यानं शहरात एकच खळबळ उडाली. आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे: माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याचा निनावी फोन कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला आल्यानं शहरात एकच खळबळ उडाली. आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज घरी कोणालाही काही न कळवता परदेशात जाण्यास निघाला. त्यासाठी त्यानं पुण्याहून फ्लाईट घेतलं, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तानाजी सावंत तिथेच उपस्थित होते. कोणालाही काही न कळवता घरातून निघून जाण्याची पद्धत आमच्या घरात नाही, असं तानाजी सावंत यावेळी म्हणाले.

    ऋषिराज सावंत घरात कोणालाही न सांगता निघून गेला. त्यानंतर बरेच तास उलटूनही त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्याचवेळी पोलीस नियंत्रण कक्षाला एक निनावी फोन आला. तानाजी सावंत यांच्या मुलाचं विमानतळ परिसरातून अपहरण झाल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीनं दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. तानाजी सावंत यांच्या कुटुंबाची चौकशी करण्यात आली.
    माजी मंत्री तानाजी सावंतांच्या मुलाचं अपहरण झाल्याचा निनावी कॉल; सत्य वेगळंच, पुण्यात खळबळ
    तानाजी सावंत पोलीस आयुक्तालयात पोहोचले. त्यांनी पोलीस उपायुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याशी चर्चा केली. यानंतर दोघांनी एक पत्रकार परिषद घेत घडलेला घटनाक्रम कथन केला. ‘ऋषिराज सावंत कुटुंबातील कोणालाही काहीच न सांगता घरातून निघून गेला. त्यानं फ्लाईट घेतलं. त्याला परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहे. या प्रकरणात सिंहगड पोलीस ठाण्यात अपहरणाचा एफआयआर दाखल आहे. गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. ऋषिराजला सुखरुप परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी फ्लाईट ट्रॅक करण्यात आलं आहे,’ अशी माहिती शर्मांनी दिली.

    घरात कोणालाही न सांगता जाण्याची पद्धत आमच्याकडे नाही. आम्ही कुटुंबातील सदस्यांच्या सातत्यानं संपर्कात असतो. पण ऋषिराज आज न सांगता गेला, अशी माहिती तानाजी सावंतांनी माध्यमांना दिली. ‘वाकडला जायचं असेल तर आम्ही एकमेकांना कळवतो. पण ऋषिराज कोणालाच काही न सांगता विमानतळावर गेला. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र आहेत. ते तिघे दुसऱ्याच गाडीनं विमानळावर पोहोचले,’ अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली.
    तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत किडनॅप? पोलीस उपायुक्तांचं पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण
    ‘ऋषिराज आणि त्याच्यासोबत असलेले दोघे कोणत्या फ्लाईटनं गेले त्याची माहिती माझ्याकडे नाही. बराच काळ त्याच्याशी संपर्क न झाल्यानं मी पोलीस आयुक्तालयात आलो आणि झाला प्रकार त्यांना सांगितला. कारच्या चालकानं दिलेल्या माहितीमुळे ऋषिराज विमानतळावर गेल्याचं मला समजलं. त्याच्यासोबत त्याचे मित्रच आहेत. त्यामुळे हा अपहरणाचा प्रकार नाही,’ असं सावंतांनी सांगितलं.

    ऋषिराजसोबत त्याचे मित्रच आहेत, असं सावंत यांनी माध्यमांना सांगितलं आहे. पण प्रत्यक्षात सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये अपहरणाचा उल्लेख आहे. याशिवाय पोलिसांना आलेल्या निनावी कॉलमध्येही अपहरणाचा उल्लेख आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहितीत आणि एफआयआरमध्ये बरीच तफावत दिसून येत आहे. त्यामुळे ऋषिराज बेपत्ता आहे की त्याचं अपहरण झालंय, हा प्रश्न कायम आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed