• Sun. Mar 8th, 2026
    पराभवामुळे काँग्रेसला हादरे, संघटनेत खांदेपालट होण्याची शक्यता; दिल्ली निवडणुकीनंतर अंतर्गत हालचाली वाढल्या

    Mahrashtra Congress Changes : गामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता मुंबई प्रदेश काँग्रेसमध्येही खांदेपालट होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

    महाराष्ट्र टाइम्स

    म.टा. प्रतिनिधी, मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता मुंबई प्रदेश काँग्रेसमध्येही बदल केले जाण्याची शक्यता आहे. मुंबईच्या निवडणुकीला लागलेला विलंब लक्षात घेता ही शक्यता आणखी बळावली आहे.

    महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा जोरदार धक्का बसला. यात अनेक दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागल्याने महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यातच नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता न आल्याने याचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

    महाराष्ट्रातून सुरुवात
    लवकरच देशभरातील काँग्रेसमध्ये अंतर्गत बदलांचे वारे वाहू लागले आहेत. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून केली जाऊ शकते. राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ १६ जागांवर विजय मिळविता आला होता. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नेते बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गजांचा पराभव झाला. या पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत बदलाची दाट शक्यता वर्तविली जात होती. त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह प्रभारी रमेश चेन्नितला यांच्या जागी नवी नियुक्ती केली जाऊ शकते, अशी चर्चा होती.
    छगन भुजबळांचा गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल मोठा गाैप्यस्फोट, म्हणाले, त्यांनी मला…
    कोणाची नावे चर्चेत?
    दिल्लीतील विधानसभा निवडणुकीमुळे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पुढे ढकलण्यात आल्या. आता दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर त्या लवकरच जाहीर केल्या जातील, असे बोलले जात आहे. यात प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, असे काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांकडून सांगितले जात आहे.

    देशमुख यांच्यासह काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते सतेज बंटी पाटील यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. माजी मंत्री आणि दलित नेते म्हणून ओळख असणारे डॉ. नितीन राऊत यांच्याही नावाची चाचपणी काँग्रेसकडून केली जात आहे, अशी माहिती पक्षातील एका बड्या नेत्याने सोमवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिली. प्रदेशाध्यक्षांसह इतरही अनेक बदल केले जाऊ शकतात, अशी चर्चा महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुरू आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed