• Sun. Mar 15th, 2026

    नाशिक पालकत्वाचा पेच सुटेना! जिल्हा नियोजनासह सिंहस्थ आराखडाही लटकला, दोन आठवड्यांनंतरही भिजत घोंगडे

    नाशिक पालकत्वाचा पेच सुटेना! जिल्हा नियोजनासह सिंहस्थ आराखडाही लटकला, दोन आठवड्यांनंतरही भिजत घोंगडे

    Nashik News: भाजपने पालकमंत्रिपदावरील दावा कायम ठेवला असताना, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटही आपला दावा सोडायला तयार नसल्याने पालकमंत्रिपदाचा पेच सुटण्याऐवजी वाढत चालल्याचे चित्र आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    nashik mahakumbhAI

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरील गिरीश महाजनांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती देऊन दोन आठवडे उलटले तरी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय होत नसल्यामुळे महायुतीत अस्वस्थता पसरली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पापूर्वी जिल्हा नियोजन समितीची बैठक होणे अपेक्षित असले तरी पालकमंत्रिपदाचा फैसला होत नसल्याने प्रशासकीय पातळीवरही अनास्था निर्माण झाली आहे. भाजपने पालकमंत्रिपदावरील दावा कायम ठेवला असताना, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटही आपला दावा सोडायला तयार नसल्याने पालकमंत्रिपदाचा पेच सुटण्याऐवजी वाढत चालल्याचे चित्र आहे.

    नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दाओस दौऱ्यावर जाण्यापूर्वी १९ जानेवारीला पालकमंत्रिपदांची यादी जाहीर केली होती. मात्र, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत नाराजीनाट्य सुरू झाले होते. महायुतीतील राज्यमंत्र्यांना पालकमंत्रिपद मिळाले असताना शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ मंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना नाशिक जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भुसेंऐवजी भाजपचे नेते व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना पालकमंत्री केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला चोवीस तासांतच स्थगिती दिली होती. यानंतर पालकमंत्रिपदावर राष्ट्रवादी अजित पवार गटासह शिवसेना शिंदे गटाकडून पालकमंत्रिपदासाठी दावा केला गेला आहे. शिंदे गटाकडून भुसेंना पालकमंत्रिपद देण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले होते. मुख्यमंत्री दाओसहून परतल्यानंतर नाशिकसह रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, या स्थगितीला आता दोन आठवडे उलटले तरी पालकमंत्रिपदाचा निर्णय होत नसल्यामुळे प्रशासकीय पातळीवर निराशा, तर महायुतीच्या घटकपक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे.
    आमिषांना बळी पडू नका! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
    मलईवरून रस्सीखेच, नुकसान नाशिकचे

    उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजनाचा आराखडा तयार केला जात असून, त्याचा आढावाही घेतला जात आहे. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री राहत असल्याने पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आराखड्याला चाल दिली जाते. मात्र, नाशिकचे पालकमंत्रिपदच रिक्त असल्यामुळे प्रशासनाचीही कोंडी झाली आहे. दुसरीकडे सिंहस्थासाठी १५ हजार कोटींचा आराखडा तयार झाला असून, त्या राज्य व केंद्राच्या पातळीवरून पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. त्यासाठी पालकमंत्रिपद आवश्यक आहे. मात्र, पालकमंत्रिपदाच्या मलईवरून महायुतीत सुरू असलेल्या रस्सीखेचामुळे नाशिककरांचे नुकसान होत असल्याचे चित्र आहे.
    Devendra Fadnavis: उद्योगांना त्रास दिल्यास थेट ‘मकोका’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलिसांना आदेश
    भाजपचा दावा सोडण्यास नकार

    मुख्यमंत्री परतल्यापासून नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतल्या तिन्ही घटकपक्षांमध्ये खल सुरूच आहे. महाजन यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थगिती दिली असली तरी नाशिकवरील दावा सोडण्यास भाजप तयार नसल्याचे चित्र आहे. भाजपचे पाच आमदार असून, सिंहस्थ काळामुळे कोणत्याही परिस्थितीत नाशिकचे पालकमंत्रिपद सोडायचे नाही, असा पवित्रा भाजपने घेतल्याचे समजते. दुसरीकडे राष्ट्रवादीही आपला हक्क सोडायला तयार नाही. शिंदे गटानेही भुसेंसाठी शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदाकडे आता सर्वांच्या नजरा लागून आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed