• Fri. Aug 7th, 2026
    राजमाता जिजाऊ भोसले यांच्या राजवाड्याला वणव्याची झळ, मोठं नुकसान, प्रशासनाचे दुर्लक्ष?

    Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 4 Feb 2025, 10:04 am

    Rajmata Jijau Bhonsle : ऐतिहासिक पाचाड गावातील राजमाता जिजाऊंच्या राजवाड्याला सोमवारी पुन्हा वणव्याची झळ सोसावी लागली. या राजवाड्याच्या भिंतींवरील आणि वाड्याच्या परिसरातील गवत न काढल्याने शेजारून आलेला वणवा या राजवाड्यातील उगवलेल्या गवताला लागला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अमुलकुमार जैन, महाड : रायगड जिल्ह्यातील, रायगड किल्ल्यापासून काही अंतरावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ यांचा राजवाडा हा महाड तालुक्यातील पाचाड येथे आहे. ऐतिहासिक पाचाड गावातील राजमाता जिजाऊंच्या राजवाड्याला सोमवारी पुन्हा वणव्याची झळ सोसावी लागली. या राजवाड्याच्या भिंतींवरील आणि वाड्याच्या परिसरातील गवत न काढल्याने शेजारून आलेला वणवा या राजवाड्यातील उगवलेल्या गवताला लागला. अशा घटनांमुळे ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान होत असून त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल ग्रामस्थांनी चिंता आणि नाराजी व्यक्त केली आहे.

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता मासाहेब जिजाऊ यांचा राजवाडा रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथे आहे. आज या राजवाड्याच्या संरक्षक भिंती आणि वाड्याच्या जोत्याचे अवशेष शिल्लक आहेत. अनेक वर्ष पुरातत्व खात्यामार्फत आणि रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून लाखो रुपये संवर्धनासाठी खर्च केले जातात. परंतु, संरक्षक भिंती आणि परिसरात उगवलेले गवत काढले जात नसल्याने, वणव्यामध्ये ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान होत आहे. सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ऐतिहासिक पाचाड गावातील राजमाता जिजाऊ वाड्याच्या परिसरात लागलेला वणवा थेट राजवाड्यात येऊन ठेपला. राजवाड्याच्या भिंतींवर आणि आतील परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असल्याने या गवताने पेट घेतला. यामुळे वाड्याच्या आतील बाजूस असलेल्या ऐतिहासिक वस्तूंचे नुकसान होत आहे.

    दरवर्षी राजवाड्याच्या आणि जिजामाता समाधीस्थळावर देखभाल दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी सध्या संवर्धनाचे काम सुरू आहे. मात्र या संवर्धनामध्ये ऐतिहासिक वास्तूंच्या आजुबाजूचे आणि परिसरात उगवलेले गवत काढले जात नसल्याने, या ठिकाणी वणवे लागत आहेत. गेल्या वर्षीही अशाच वणव्यात नुकसान झाले होते. यावेळी वणवा थेट राजवाड्याच्या परिसरात आल्याने तेथे काम करणाऱ्या पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. मोठ्या प्रमाणात आग लागल्याने ही आग आटोक्यात आणणे कठीण झाले होते. ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात वणवे लागू नये यासाठी राज्य सरकार आणि पुरातत्व विभागाने उपायोजना करणे गरजेचे आहे. असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed