• Sun. Mar 15th, 2026
    राज्यात ५,४०० ‘आपदा मित्र’; आपत्तीशी सामना करण्यासाठी सरकार १६ जिल्ह्यांमध्ये करणार निवड

    Contributed by भाग्यश्री लहाने | Edited byकिशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 30 Jan 2025, 2:18 pm

    Aapda Mitra: राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत देशभरात ‘आपदा मित्र’ ही संकल्पना राबविली जात आहे. या निवडीनंतर राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये ५ हजार ४०० आपदा मित्र सेवेत रुजू होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    aapda mitra

    भाग्यश्री लहाने, बुलढाणा : पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसलेल्या राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला बळकटी देण्यासाठी; तसेच आपत्तीच्या वेळी तातडीने नागरिकांना मदत मिळावी, याकरिता ‘आपदा मित्र’ निवडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत देशभरात ‘आपदा मित्र’ ही संकल्पना राबविली जात आहे. या निवडीनंतर राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये ५ हजार ४०० आपदा मित्र सेवेत रुजू होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

    पावसाळ्यात विविध आपत्तींशी सामना करावा लागतो. संकटात सापडलेल्या लोकांना तातडीने मदत मिळावी, आपत्तीतून त्यांचा बचाव व्हावा, यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाची यंत्रणा तत्पर असावी लागते. वेळीच मदत मिळत नसल्याने जीवघेणी परिस्थिती उद्भवू शकते. काहींना जीवही गमवावा लागतो. कुठलीही आपत्ती असो, तातडीने मदत मिळावी या उद्देशाने ‘आपदा मित्र’ ही संकल्पना राबविली जाणार आहे. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधीन असलेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पट्टीच्या पोहणाऱ्यांसह गावागावांतील काही मदतीसाठी पुढे येणाऱ्या नागरिकांच्या नावांची नोंद असायची. पोलिस पाटील, शासकीय कर्मचारी, पोलिस कर्मचाऱ्यांना फोन करून ‘अलर्ट’ केले जायचे. आता हे लोकही मिळत नाहीत. त्यामुळे ‘आपदा मित्र’ हा पर्याय शोधण्यात आला आहे. विशेषत: युवक, युवतींच्या निवडीवर अधिक भर राहणार आहे. १८ ते ४५ वयोगटातील इच्छुकांना नावनोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मुख्यालयातून करण्यात आले आहे.

    स्थानिकांना आपत्ती व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण देऊन सक्षम करणे हे या योजनेचे मूळ उद्दिष्ट आहे. या योजनेच्या माध्यमातून जीवितहानी कमी करणे, समाजात आपत्ती व्यवथापनाबाबत जनजागृती करणे व आपत्तीला प्राथमिक स्तरावर प्रतिसाद देण्याकरिता मनुष्यबळ तयार करणे, हे साध्य केले जाणार आहे.

    तीन जिल्ह्यांत प्रत्येकी पाचशे मित्र
    राज्यातील जिल्हानिहाय विचार करता पालघरमध्ये ५००, कोल्हापूर ५०० व छत्रपती संभाजीनगरात ५०० ‘आपदा मित्र’ निवडले जाणार आहेत. यासोबतच सोलापूर, धुळे, जालना, बीड, लातूर, हिंगोली, धाराशिव, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ३०० असे ५ हजार ४०० आपदा मित्र निवडले जाणार आहेत.

    बारा दिवसांचे प्रशिक्षण
    सरकारने आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याबाबत मान्यता दिली आहे. निवड झालेल्यांना बारा दिवसांचे निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. १८ ते ४५ वयोगटातील शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, एनजीओ, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांची यात निवड केली जाईल. डॉक्टर, माजी सैनिक, स्थापत्य अभियंत्यांसाठी ५५ वर्षांची वयोमर्यादा आहे.

    पाच लाखांच्या अपघात विम्याचे कवच आपदा मित्रांना प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आपत्तीसमयी शोध व बचाव कार्य करताना अपघात झाल्यास सरकारकडून तीन वर्षांसाठी पाच लाख रुपयांचा अपघात विमा दिला जाणार आहे; तसेच वैयक्तिक आपत्कालीन प्रतिसादकर्ता संच पुरविण्यात येणार आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed