Mumbai Boat Accident: गेटवेहून एलिफंटाकडे निघालेली प्रवासी बोट उलटून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीतील १०१ प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. नौदलाच्या स्पीड बोटनं प्रवासी बोटीला थेट धडक दिल्यानं हा अपघात घडला.
हैदराबादची एक व्यक्ती फिरण्यासाठी मुंबईला आलेली होती. ती व्यक्ती नीलकमल बोटीत होती. सुदैवानं त्यांचा जीव वाचला. त्यांनी संपूर्ण घटनाक्रम कथन केला. ‘मी दुपारी साडेतीन वाजताल बोटीत चढलो. आम्ही समुद्रात १० किमीपर्यंत गेलो होतो. लहान स्पीड बोट नागमोडी वळणं घेत आमच्या बोटीवर आदळली. त्यानंतर आमच्या बोटीत पाणी शिरलं. मग चालकानं आम्हाला लाईफ जॅकेट घालण्यास सांगितलं. त्यावेळी मी वर होतो. खाली येऊन जॅकेट घातलं. त्यावेळी बोटीत पाणी भरलं होतं. काही वेळात बोट उलटली. मग मी १५ मिनिटं पोहत होतो. दुसऱ्या बोटीनं आमची सुटका केली आणि गेटवेला आलो,’ असा घटनाक्रम त्यानं सांगितला.
Mumbai Boat Accident: बोट बुडत होती, प्रवासी जीवाच्या आकांतानं ओरडत होते; काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO समोर
‘बोटीत १०० हून अधिक जण होते. लहान मुलांची संख्याही जास्त होती. अनेक जण कुटुंबासोबत होते. सुरुवातीला लाईफ जॅकेट्स देण्यात आली नाहीत. बोटीत पाणी शिरल्यानंतर लाईफ जॅकेट्स देण्यात आली. बोटीत पाणी भरल्यानंतर ती उलटली. मी बोटीचा आधार घेतला. पाण्यात साधारणत: १५-२० मिनिटं होतो. त्यानंतर आमची सुटका झाली,’ अशी माहिती अपघातातून बचावलेल्या प्रवाशानं दिली.
स्पीड बोट धडकली, एकाचा पाय कापला गेला, तो आमच्या बोटीत पडला; प्रत्यक्षदर्शीनं थरार सांगितला
बोटीचं तिकीट २९० रुपये होतं. मी वर जाऊन बसलो होतो. त्यासाठी त्यांनी माझ्याकडून ५० रुपये अतिरिक्त घेतले. आम्ही ३.३० ला बोटीत गेलो. त्यानंतर ४० मिनिटांनी अपघात घडला. एक स्पीड बोट सुसाट वेगात आमच्या बोटीभोवती फेरी मारत होती. त्यात ८ ते १० जण होते. त्यावेळी मी बोटीच्या वर होतो. स्पीड बोट प्रचंड वेगात आमच्या बोटीला धडकली. त्या अपघातात स्पीड बोटीतील एकाचा पाय कापला गेला. तो आमच्या बोटीत येऊन पडला, असा थरकाप उडवणारा प्रसंग प्रवाशानं कथन केला.

