Mumbai College Online Admission Scam: विद्याविहारच्या सोमय्या शैक्षणिक संकुलातील तीन कॉलेजांमध्ये तब्बल ५० विद्यार्थ्यांनी बनावट गुणपत्रिका आणि कागदपत्रांच्या आधारे अकरावीत प्रवेश मिळविल्याचे उघड झाले.
हायलाइट्स:
- सोमय्या शैक्षणिक संकुलातील तीन कॉलेजांमधील प्रकार
- कॉलेजांतील दोन लिपिकांसह सहा जणांवर गुन्हा
- तिघांना अटक, इतरांचा शोध सुरू
त्यानंतर सोमय्या शैक्षणिक संकुलातील उर्वरित दोन कॉलेजांनी काटेकोर पडताळणी केली. यामध्ये तब्बल ५० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी बनावट गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचे दाखले, तसेच इतर कागदपत्रे जोडल्याचे समोर आले. के. जे. सोमय्या आर्ट्स-कॉमर्स कॉलेजमध्ये २४, एस. के. सोमय्या, तसेच विनय मंदिर ज्युनिअर कॉलेजमध्ये १७, के. जे. सोमय्या सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेजमध्ये असे नऊ विद्यार्थी आढळले. ‘पैसे घेऊन प्रवेश दिल्याचे आरोपी मान्य करत आहेत. नेमक्या किती रकमेची देवाणघेवाण झाली आणि किती रक्कम लिपिकांच्या वाट्याला आली, हे चौकशीतून स्पष्ट होईल,’ असे पोलिसांनी सांगितले.
अशी केली फसवणूक
दहावीनंतर कॉलेजमधील प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जाते. यामध्ये विद्यार्थी राज्य बोर्डातून दहावी पास झाला असल्यास आसन क्रमांक आणि इतर माहिती टाकून गुणपत्रिका, इतर प्रमाणपत्रे वेबसाइटवर दिसतात. मात्र सीबीएसई, आयसीएसई, तसेच इतर केंद्रीय बोडांच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका या संबंधित कॉलेजांच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणित केल्यानंतर अपलोड केल्या जातात. याच प्रक्रियेचा गैरफायदा महेंद्र पाटील आणि अर्जुन राठोड या दोन लिपिकांसह देवेंद्र सायदे, कमलेश, जितू आणि बाबू यांनी घेतला. खोट्या गुणपत्रिका, शाळा सोडल्याचे दाखले आणि इतर बनावट कागदपत्रे प्रवेशादरम्यान सोबत जोडली.
५२ टक्क्यांचे केले ९३ टक्के
तिसऱ्या फेरीअखेरही पाल्याचे नाव यादीत नसल्याने निराश झालेल्या पालकांना आरोपींनी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, असे प्रलोभन दाखवले. यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांतील गुणांमध्ये १० ते ४० टक्के इतकी वाढ केली. एका विद्यार्थिनीला ५२ टक्के गुण मिळाले होते. ही टक्केवारी ९३ टक्क्यांपर्यंत वाढविल्याचे उघड झाले.
पैशांची देवाणघेवाण
‘पैसे घेऊन प्रवेश दिल्याचे आरोपी मान्य करत आहेत. मात्र एका विद्यार्थ्यांमागे किती रक्कम त्यांनी घेतली आणि किती रक्कम लिपिकांच्या वाट्याला आली, हे स्पष्ट होईल,’ असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या सर्व आरोपींनी लाखो रुपये स्वीकारल्याचा अंदाज आहे. याबाबत ५० विद्यार्थ्यांच्या पालकांकडे चौकशी करण्यात येईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

