• Sat. Sep 21st, 2024

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्ष नकली; नांदेडमध्ये अमित शाहांची सडकून टीका

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्ष नकली; नांदेडमध्ये अमित शाहांची सडकून टीका

नांदेड : शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष हे आधीच अर्धे होते, आता या दोघांनी मिळून काँग्रेस पक्षाला अर्ध केलं आहे. तीन तिघडा काम बिघडा अशी परिस्थिती या पक्षांवर आली आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही नकली पक्ष आहेत. हे तीन नकली पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्राचं हित काय करणार अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली. गुरुवारी भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ जिल्ह्यातील नरसी येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेदरम्यान त्यांनी ही टिका केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, केंद्रीय मंत्री भागवत कराड, भाजप उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते.अमित शाह पुढे म्हणाले की, देशाच्या विकासासाठी भाजप सक्षम आहे. ३७० कलम हटवले. अयोध्येत राम मंदिराची उभारणी केली. त्याचबरोबर महाराष्ट्रासह देशात समृद्धी महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचबरोबर महिलांना उज्ज्वला गॅस, गरीबांना स्वस्त धान्य, गरजूंना पाच लाखापर्यंत मोफत उपचार देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात जालना समृद्धी मार्ग, नागपूर – गोवा द्रुतगती मार्गाचे काम जोरात सुरू आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्याचे नामकरण करून अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवला आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून पाचवी यादी जाहीर; पालघर, रायगड, मुंबईतील उमेदवारांची घोषणा
काँग्रेस महाराष्ट्राचा विकास करू शकत नाही हे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वांनी पाहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील १ कोटी १६ लाख शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी उपलब्ध करूना दिला आहे. शेतकऱ्यांना पीक विमा याचबरोबर शेतीसाठी शासनाने करोडो रुपयाचे अनुदान दिले आहे. शरद पवार यांनी आत्तापर्यंत राज्याला काय दिले, हा प्रश्न सर्वांनी विचारला पाहिजे. राज्यातील नक्षलवाद संपवण्याचे काम केंद्र सरकारच्या मदतीने केले आहे. चंद्रपूर भागात आणि राज्यातील इतर भागांमध्येही मोठ्या प्रमाणात दहशतवाद निर्माण झाला होता. नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केंद्राने राज्याला पाठबळ दिले. त्यामुळे या भागात नागरिक निर्भयपणे राहात आहेत.
ठाकरेंनी भाजपकडून जी जागा २०१९ ला मागून घेतली, तिथे नोटापेक्षाही कमी मतं मिळाली
महाराष्ट्राचा विकास फक्त भाजपच करू शकते. केंद्र सरकारने आत्तापर्यंत महाराष्ट्राला ७ लाख करोड रुपये निधी दिला आहे. काँग्रेसने देशात ७० वर्ष सत्ता भोगली. मात्र महाराष्ट्राचा विकास झाला नाही. भाजपने दहा वर्षात मोठा विकास केला आहे. नरेंद्र मोदी यांना साथ देण्यासाठी नांदेडमधून महायुतीचे उमेदवार खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांना साथ द्यावी, असे आवाहन केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केले.

अमित शाहांकडून शिवरायांच्या घोषणा, भाषणाच्या सुरुवातीलाच गांधी-पवार-ठाकरेंवर घराणेशाहीवरुन टीका!

अशोक चव्हाणामुळे चिखलीकरांची शक्ती दुप्पट – फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, कमळ हे चिखलात फुलणारे आहे. खा. चिखलीकर हे निश्चितच नांदेडमधून फुलतील, हा आम्हाला विश्वास आहे. मराठवाड्याचा विकास भाजपनेच केला आहे. नांदेडला सर्वाधिक निधी राज्य सरकारने दिला आहे. यापुढेही निधी कमी पडू देणार नाही. झुकते माप नांदेडला देण्याचा भाजपचा मानस आहे. आता दोन शक्ती एकत्र आल्या आहेत. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे प्रतापरावांची शक्ती दुप्पट झाली आहे. त्यामुळे त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही. ते निश्चितच बाजी मारतील यात शंका नाही, असे मत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed