कांद्याच्या धोरणावरून शरद पवार यांची सत्ताधाऱ्यांवर टीका
एका बाजूने महागाई आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतीमालला किंमत नाही. आपण सगळे जिरायत भागातले लोक आहात. जिरायत भागातले एक महत्त्वाचे पीक कांदा हे आहे. आता त्या कांद्याला दोन पैसे मिळत नाहीत. महाराष्ट्राच्या बाहेर कांद्याला किंमत मिळते, कांदा निर्यातीची मागणी केली, मोदी सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम कांद्याच्या किमती खाली आल्या. मोदी सरकार इथेच थांबले नाही, परदेशातून कांदा मागवायचा हा निकाल त्यांनी घेतला आणि त्या सगळ्याची किंमत जिरायत भागात कांद्याचं पिक घेणारा जो शेतकरी आहे त्याला द्यावे लागत आहे.
उत्पादनाची खर्च वाढतोय आणि मालाची किंमत कमी होतेय
संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये शेतापाण्याची स्थिती वाईट आहे. पाण्याचं संकट आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागवायची वेळ आली. थोड्या दिवसाने चारा छावण्या काढण्याचा कार्यक्रम करावा लागेल. परंतु या परिस्थितीतून शेतकऱ्याला बाहेर काढण्याची सत्ताधाऱ्यांची इच्छा नाही. या भागात साखर कारखाने आहेत. साखरेला २ पैसे अधिक मिळतील अशी अपेक्षा आहे. पण साखर निर्यात करायची नाही हा निकाल मोदी सरकारने घेतला. काही भागामध्ये सोयबिनचे पिक घेतले जाते. आज सोयबिनच्या किमती खाली आलेल्या आहेत. म्हणजे शिवारात जे पिकवायचं त्याचा उत्पादनाचा खर्च काही कमी होत नाही. पण त्यांनी पिकवलं त्याची किंमत मात्र कमी होते, असे दुहेरी संकट आज मोदी सरकारने आपल्या सगळ्यांच्या समोर आणलंय, असे पवार म्हणाले.
योग्य कारभार नसणाऱ्यांना खुर्चीतून हटवावे लागेल
काळ अडचणीचा आहे आणि त्याच काळात निवडणूक निघाली आहे. लोकशाहीमध्ये लोकांच्या मताचा अधिकार हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि तो अधिकार आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. त्या अधिकाराचा वापर करून या निवडणुकीमध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांचा कारभार योग्य नसेल तर योग्य कारभार आणण्याचा निकाल आपल्याला या निवडणुकीमध्ये घ्यावा लागेल, असे आवाहन पवार यांनी जनतेले केले.