• Sun. Mar 8th, 2026
    वसई-विरार पालिकेकडून ६० कोटींची पाणीपट्टी वसुली, गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्पन्नात १० कोटींची घट

    म. टा. वृत्तसेवा, वसई : वसई-विरार महानगरपालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ६०. ५४ कोटींची पाणीपट्टी वसुली केली आहे. मालमत्ता कराच्या वसुलीच्या पाठोपाठ यंदा पाणीपट्टी वसुलीतदेखील घट झाल्याचे दिसून आले आहे. २०२२-२३ वर्षात ७० कोटींची वसुली झाल्यानंतर मागील वर्षात ती ६० कोटींवर आल्याने एकूण १० कोटींनी घट झाली आहे. पालिका कर्मचाऱ्यांना निवडणुका, सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी या कामांना जुंपण्यात आल्याने पाणीपट्टी वसुलीवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

    वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना सध्या धामणीच्या (सूर्या) दोन प्रकल्पातून तसेच पेल्हार आणि उसगाव या तीन धरणांतून एकूण २३० एमएलडी पाणीपुरवठा होतो. तर मागील महिन्यापासून सूर्याचे १६५ एमएलडी अतिरिक्त पाणी दाखल झाले आहे. त्यामुळे आता शहराला अधिकचा पाणीपुरवठा होत आहे.

    वसई-विरार महानगरपालिका हद्दीत झपाट्याने नागरीकरण होत असल्याने पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सूर्याचे अतिरिक्त पाणी दाखल झाल्यानंतर पालिकेने नव्याने नळजोडण्या देण्याचे काम तब्ब्ल तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा फेब्रुवारी २०२४ पासून सुरू करण्यात आले होते. त्यामुळे मागील काही वर्षांत दिलेल्या ५२ हजार जोडण्या आणि नव्याने दिलेल्या अधिकच्या जोडण्या यामधून नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे पालिका दरवर्षी अशा पाणीपट्टीधारकांकडून पाणीपट्टी वसूल करते. या पाणीपट्टीधारकांकडून ८२ कोटी ६४ लाखांची वसुली बाकी आहे.
    आचारसंहितेतही निविदाघाई; धूरफवारणी फेरप्रस्तावासाठी लगबग,वैद्यकीय अधीक्षकांकडून प्रस्तावाला ब्रेक
    त्यामुळे ही वसुली करण्यासाठी २०२३-२४ या वर्षामध्ये पालिकेने सुरुवातीपासून जोर धरला होता. पालिकेने ५० टक्के म्हणजेच ४१.४४ कोटी वसुलीचा टप्पा फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच गाठला होता. तसेच सूर्याचे अतिरिक्त पाणी दाखल झाल्याने नव्याने नळजोडण्या देण्याआधी मालमत्ता कर पूर्ण भरण्याची नवी शक्कल लढवली होती. तसेच अतिरिक्त नळजोडणीसाठी आधीच्या नळजोडण्यांची पाणीपट्टी भरण्याची अट होती. त्यामुळे पालिकेने मागील आर्थिक वर्षात ६० कोटी पाणीपट्टी वसुलीचा टप्पा गाठला आहे. यामध्ये विरार पूर्व भागातील सर्वाधिक ११ कोटींची वसुली आहे, तर सर्वात कमी आय प्रभाग समितीची २ कोटींची वसुली झाल्याची माहिती पालिकेने दिली.

    २०२२-२३ या वर्षात ७० कोटींची पाणीपट्टी वसुली झाली होती. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा वसुलीत १० कोटींनी घट झाली आहे. कर्मचाऱ्यांवर विविध कामांचा भार आल्याने वसुलीत घट झाल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

    नळजोडण्या खंडीत

    पालिका हद्दीतील ५ हजारांपेक्षा जास्त पाणीपट्टीची रक्कम थकबाकी असलेल्या पाणीपट्टीधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तसेच नोटीस देऊनही पाणीपट्टी न भरलेल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. यासाठी २७५ पाणीपट्टीधारकांच्या नळजोडण्या या कारवाईत खंडित केल्या आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed