कालिदास कलामंदिर येथे शुक्रवार (दि. ५) आयोजित केलेल्या गिरणा गौरव पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, अनेकांच्या कामाची कदर केली जात नाही. जो काम करीत नाही त्याला पुरस्कार दिले जातात. मात्र, जो काम करतो त्याला सहसा पुरस्कार मिळत नाही. त्यामुळे गिरणा गौरव पुरस्कार सच्चा कार्यकर्त्यांना दिला जातो आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. पद्म पुरस्काराबद्दल काकासाहेब कालेकरांचे एक महत्त्वाचे वाक्य आहे. ‘जो जो सरकारी होता है, वो असरकारी होता है’ बिन सरकारी पुरस्कारांना विशेष महत्त्व आहे. सरकारी पुरस्कारांमध्ये आता तथ्य राहिलेले नाही. त्यामुळे गिरणा गौरव पुरस्काराला विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. एअरफोर्सचे एक ब्रीदवाक्य आहे, ‘टच द स्काय’, आभाळाला हात लावण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे तरच यश मिळते, असे ते म्हणाले. यावेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी म्हणाले की, अनेकदा मी कुठून सुरुवात करू, असा अनेकांना प्रश्न पडतो. मात्र, दामोदर मावजो यांचे बंधू हनुमंत मावजो यांच्याकडे पाहिले तर त्यांनी आपली पहिली कविता ही वयाच्या सत्तराव्या वर्षी केली. त्यामुळे ठराविक एका वयात सुरुवात केली म्हणजे यश मिळते असे नाही. तुम्ही कधीही सुरुवात करा, यश मिळेलच यात शंका नाही.
यांना मिळाला पुरस्कार
यावेळी गिरणा गौरव पुरस्काराचे प्रमुख सुरेश पवार यांच्या उपस्थितीत मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर, आमदार देवयानी फरांदे, योगेश सोनवणे, प्रशांत पाटील, रवींद्र मालुंजकर, डॉ. विलास बच्छाव, अविनाश धनाईत, प्रशांत खरोटे, भूषण पगार, विकास नवाळे, किरण वाघ, किशोर खैरनार यांचा समावेश होता.