• Sat. Sep 21st, 2024
यंदा विमानातून मालाची वाहतूक आणखी कमी, कार्गो वाहतुकीत चक्क ‘इतकी’ घट

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : येथील विमानतळावरून आता दिल्ली-मुंबईसह हैदराबाद, बेंगळुरू आणि अहमदाबादसाठी सेवा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून पाच एअर बस ३२०/३२१ आणि तीन एटीआर विमानद्वारे प्रवासी वाहतूक होत आहे. असे असतानाही देशांतर्गत विमान मालवाहतुकीत एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या काळात ३७ टक्के घट झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. विमानतळावरून रोज १४ विमानांची ये जा होत आहे. त्यातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची संख्या १६०० ते १८०० दरम्यान नोंदविण्यात आली आहे.
‘यूपीआय’द्वारे रोज पाच हजार तिकिटांची विक्री, एसटीच्या खात्यात इतक्या कोटींचा महसूल गोळा
विमान प्रवासी वाहतुकीत विमानतळाला चांगला फायदा होत आहे. मात्र विमान प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांना विमानतळावरून देशांतर्गत विविध शहरांसाठी माल वाहतुकीतून उत्पन्न हे विमानासाठी फायदेशीर ठरत असते. या मालवाहतुकीमुळे विमानाच्या नफ्यात वाढ होत असते. मालवाहतुकीतून चांगले उत्पन्न मिळाल्यास संबंधित विमान कंपनी त्या विमानतळावरून अन्य शहरांसाठी विमाने सुरू करण्याचा प्रयत्न करतात. शहरातील विमानतळावरून ३० मार्चपासून अहमदाबाद या नवीन शहरांसाठी सेवा सुरू झाली. त्यामुळे दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बेंगळुरूसह आता अहमदाबादलाही विमान उपलब्ध झाले आहे.

या विमानतळावरून या वर्षी फेब्रुवारी महिन्यात फक्त ४९ मेट्रीक टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ही मालवाहतूक ही ५६ मेट्रीक टन इतकी होती. एक महिन्यात ७ मेट्रीक टन कमी वाहतूक विमानतळावरून झालेली आहे. ही घट १३ टक्के इतकी आहे. चारशे मेट्रीक टनाने घट एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या काळात मालाची वाहतूक या विमानतळावरून ही ६८२ मेट्रीक टन इतकी करण्यात आली आहे. तर एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या काळात या विमानतळावरून १ हजार ८६ मेट्रीक टन मालाची वाहतूक करण्यात आली होती. गेल्या वर्षी पेक्षा यंदाच्या वर्षी विमानातून मालाची वाहतूक ४०० मेट्रीक टनपेक्षा अधिक कमी आलेली आहे. ही घट ३७. २ टक्के इतकी असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed