एकनाथ शिंदे काय म्हणाले?
विरोधक खालच्या पातळीवर टीका करत आहेत. पण आपण पातळी सोडायची नाही. शिव्याशाप द्यायचे नाही. विरोधकांना एक्सपोज करा, अशा सूचना करतानाच आपण महायुती म्हणून लोकसभा निवडणुकांना सामोरे जातोय, त्यामुळे पक्षाची जी भूमिका आहे त्याच्या विरोधात कुणालाही जाता येणार नाही, महायुतीतील घटकपक्षांना सहकार्याची भूमिका ठेलवा. शेवटी लोकसभा निवडणूक ही विधानसभेची नांदी आहे. यावरच पक्षाचे आणि तुमचे अस्तित्व राहणार आहे, अशी सक्त ताकीदच मुख्यमंत्र्यांनी आमदार-खासदारांना दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. बाळासाहेबांचे विचार सोडले. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या शिवाजी पार्कमधील समारोपीय भाषणात ठाकरेंना हिंदू बांधव भगिनी म्हणायची लाज वाटली. २०१९ साली ठाकरेंनी जनमताचा आदर करून महाविकास आघाडीची स्थापना केली. बाळासाहेबांच्या इच्छेविरूद्ध ते वागत आहेत, हे मुद्दे लोकांसमोर मांडण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
लोकांसमोर जात असताना केवळ राजकारण घेऊन जाऊ नका. आपल्या सरकारने केलेल्या कामांची यादी त्यांच्यासमोर ठेवून लोकांची मने वळवा. ५०/६० वर्षात कॉंग्रेसने काय केलं आणि गेल्या १० वर्षात काय झालं हे लोकांसमोर मांडा. अडीच वर्ष सरकार घरी बसलं होतं. गेल्या दोन वर्षात आपलं शासन लोकांच्या दारी गेलंय हे आवर्जून सांगा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आपण मराठा आरक्षण दिले. न्यायालयीन पातळीवर टिकणारे आरक्षण दिले आहे.पोलिस भरती या आरक्षणानुसार होत आहेत. मराठा समाजाला न्याय दिला पण तो देत असताना ओबीसींवर कोणताही अन्याय केला नाही हे लोकांच्या मनावर ठसवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आमदार-खासदारांना केल्या.