• Sun. Jul 26th, 2026

    वर्षभरात साकार होणार आधुनिक ‘वैकुंठ धाम’ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 26, 2026
    वर्षभरात साकार होणार आधुनिक ‘वैकुंठ धाम’ – महासंवाद

    छत्रपती संभाजीनगर, दि. २६ : शहरातील ऐतिहासिक कैलासनगर स्मशानभूमीच्या सर्वांगीण पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज झाले. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि सीएसएन फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत असून, पुढील एका वर्षात आधुनिक आणि पर्यावरणपूरक ‘वैकुंठ धाम’ उभारण्याचे उद्दिष्ट आहे.

    यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, महापौर समीर राजूरकर, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्यासह लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी आणि सीएसएन फर्स्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

    मंत्री सावे म्हणाले, “प्रशासन, सामाजिक संस्था आणि सीएसआरच्या सहकार्याने उभे राहणारे असे समाजोपयोगी प्रकल्प ही काळाची गरज आहे. नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.”

    महापौर समीर राजूरकर यांनी शहराच्या विकासात सामाजिक संस्था आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगत, सीएसएन फर्स्टचा पुढाकार इतर संस्थांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

    विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रत्येक व्यक्तीला सन्मानपूर्वक अखेरचा निरोप मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार असल्याचे सांगत या प्रकल्पासाठी पहिली देणगी जाहीर केली. सीएसएन फर्स्टचे माजी अध्यक्ष ऋषी बागला यांनीही देणगी देऊन उपक्रमाला पाठबळ दिले.

    कैलासनगर स्मशानभूमी ही शहरातील सर्वात जुन्या स्मशानभूमींपैकी एक असून तिचा आधुनिक, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक विकास करण्यासाठी महानगरपालिका व सीएसएन फर्स्ट यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. प्रकल्पाची उभारणी आणि देखभाल सीएसएन फर्स्टकडून करण्यात येणार असून, आवश्यक नागरी सुविधा महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

    प्रकल्पामध्ये १२ आधुनिक अग्नीसंस्कार केंद्रे, विद्युत शवदाहिनी, लँडस्केपिंग, शिवमूर्ती, पाण्याची टाकी, स्वच्छतागृहे, पार्किंग, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत, हरित क्षेत्र आणि नागरिकांसाठी बैठकीची व्यवस्था अशा अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत. परिसरात दाट वृक्षलागवड आणि हरित पट्टा विकसित करून पर्यावरणपूरक नियोजनालाही प्राधान्य दिले जाणार आहे.

    प्रकल्पाचे वास्तुविशारद महेश साळुंके यांनी आधुनिक वास्तुरचना, पर्यावरणपूरक संकल्पना आणि पारंपरिक संस्कृतीचा सन्मान यांचा समन्वय साधणारा प्रकल्प आराखडा सादर केला.

    हा पुनर्विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहराला स्वच्छ, सुसज्ज, आधुनिक आणि सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार सुविधा उपलब्ध करून देणारे आदर्श ‘वैकुंठ धाम’ साकार होणार आहे.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed