• Sun. Mar 15th, 2026
    बीआरएसला महाराष्ट्रात खिंडार, बड्या नेत्याचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

    धनाजी चव्हाण, परभणी : काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे भारत राष्ट्र समितीच्या पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक संपन्न झाली होती. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील भारत राष्ट्र समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे काम सुरू करायचे की कसे? असे पत्र लिहून चंद्रशेखर राव यांच्याकडे विचारणा केली होती. त्याच वेळेस महाराष्ट्रातील भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी अस्वस्थ असल्याचे दिसून आले होते. आता भारत राष्ट्र समितीच्या किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भारत राष्ट्रीय समितीला चांगलेच भगदाड पडले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन वर्षांपूर्वी भारत राष्ट्र समिती हा पक्ष महाराष्ट्रामध्ये सक्रिय झाला होता. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी केलेली विकास कामे डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या पक्षाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्नही केला होता. मागील एक वर्षापर्यंत या पक्षांमध्ये राज्यातील बहुतांश माजी आमदार आणि चांगल्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेशही केला. राज्यामध्ये भारत राष्ट्रीय समिती हा पक्ष चांगला विस्तारेल असेही वाटू लागले होते. पण काही महिन्यापूर्वी तेलंगणा राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारत राष्ट्र समिती या पक्षाला पर्याय स्वीकारावा लागला.
    ‘घड्याळ’ चिन्ह वापरताना अजित पवार गटाला करावे लागेल अटींचे पालन; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, शरद पवार गटासाठी आनंदाची बातमी

    तेलंगणा राज्याची सत्ता गेल्यानंतर या पक्षाला चांगलीच घरघर सुरू झाली. महाराष्ट्रामध्ये या पक्षासाठी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील अस्वस्थता निर्माण झाली. पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे विस्तृत बैठक घेऊन महाराष्ट्रात पक्षाचे काम चालू ठेवायची की कसे? अशी विचारणा देखील केली होती. पण माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद दिसलाच नाही.

    त्यामुळे महाराष्ट्रातील भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी काय करतील? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्यातच किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माणिक कदम यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भारत राष्ट्रीय समितीला चांगलेच भगदाड पडले आहे. माणिक कदम यांनी पक्षांतर केल्यानंतर बी.आर.एसचे अन्य कार्यकर्ते पदाधिकारी देखील आता याच मार्गाने वेगवेगळ्या पक्षात जातील की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    माणिक कदम हे सुरुवातीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये सक्रिय कार्यकर्ते होते. शेतकऱ्यांसाठी काम करणारे माणिक कदम चंद्रशेखर राव यांच्यावर विश्वास ठेवून भारत राष्ट्र समितीमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्यावर महाराष्ट्राच्या किसान सेलच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील देण्यात आली होती. माणिक कदम यांनी महाराष्ट्रामध्ये बी.आर.एसची संघटनात्मक फळी चांगलीच निर्माण केली होती. त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील बऱ्याच माजी आमदारांनी पक्षात प्रवेशही केला होता. पण आता माणिक कदम यांनीच बीआरएसला रामराम केल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये आणखीनच अस्वस्थता निर्माण झाली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *