नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे राजेंद्र मराठे कुटुंबासह वास्तव्यास होते. जावई गोविंद सोनारसोबत त्याचे कायम वाद व्हायचे. नेहमीच्या वादाला कंटाळून गोविंदने सासऱ्याचा कायमचा काटा काढण्यासाठी तीन लाखांची सुपारी दिली. गेल्या आठवड्यात मराठे दुचाकीवरून जात असताना चौघांनी त्यांना थांबवले आणि जबर मारहाण केली. यामध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह नांदर्डे ते तळोदा रोडवर फरशी पुलाचे खाली टाकून जाळण्यात आला.
मराठे घरी न आल्याने कुटुंबीयांनी शहादा पोलिस ठाण्यात धाव घेतली. याचदरम्यान फरशी पुलाजवळील मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. ओळख पटल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.
नंदूरबार येथे हत्या करून चार जण बोरिवली येथे आल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-११ला मिळाली. पोलिस निरीक्षक भरत घोणे, सहायक निरीक्षक अभिजित जाधव, महिला सहायक निरीक्षक यादव, उपनिरीक्षक शिंदे, कांबळे, म्हेतर, कदम, खांडेकर, सावंत, खताते यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी गोराईच्या पेप्सी ग्राऊंडजवळ सापळा लावून लकी किशोर बिरारे आणि निलेश पाटील यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान चौघांनी सुपारी मिळाल्याची माहिती दिते गोविंदचे नाव सांगितले.