उद्घाटन सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळेंनी भाषण केलं. गेल्या दोन वर्षांपासून स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे या भागाला नगरसेवक नाहीत. मग इथल्या लोकांनी त्यांचे प्रश्न घेऊन कोणाकडे जायचं, असा सवाल सुळेंनी विचारला. सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं अशी यशवंतराव चव्हाण यांची इच्छा होती. त्यासाठी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायला हव्यात. पण मागील २ वर्षांपासून महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत. त्या व्हायला हव्यात अशी मागणी मी महायुती सरकारकडे करते, असं सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळेंच्या भाषणानंतर आमदार भीमराव तापकीर यांचं भाषण झालं. त्यानंतर अजित पवार भाषणाला उभे राहिले. पालिकेची निवडणूक व्हावी अशी आमचीही इच्छा आहे. पण ते प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका थांबल्या आहेत याची सगळ्यांनी नोंद घ्यावी, असं म्हणत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे सुळेंना प्रत्युत्तर दिलं.
आम्हीदेखील जनतेमधून निवडून येतो. त्यामुळे जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुका व्हाव्यात अशी आमचीही इच्छा आहे. महायुतीचं सरकार त्याचं मताचं आहे. पण ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असल्यानं निवडणुका होत नाहीएत. राज्य सरकार न्यायालयात बाजू मांडत आहे. हा मुद्दा लवकरात लवकर निकाली निघावा आणि निवडणूक व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहे, याची नोंद घ्यावी, असं अजित पवार म्हणाले.
पुण्यातले नगरसेवक मी आणि चंद्रकांत दादांनीच निवडून आणले आहेत. भाजपचे नगरसेवक चंद्रकांत दादांनी निवडून आणले आहेत. तर राष्ट्रवादीचे नगरसेवक मी निवडून आणले आहेत. त्यामुळे पक्ष कोणताही असो, पुण्यात दादाच नगरसेवक निवडून आणतात, असं म्हणत अजित पवारांनी मंचावर उपस्थित असलेल्या आणि पालिका निवडणूक घेण्याची मागणी करणाऱ्या सुळेंना टोला लगावला. आपल्याला पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे. त्यासाठी कामाला लागा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केली.