• Fri. Mar 13th, 2026
    मुंबई ते शिर्डी प्रवासात दीड तास वाचणार, समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन

    मुंबई : समृद्धी महामार्गाचा तिसऱ्या व पुढील टप्प्याचे सोमवारी उद्घाटन झाल्याने आता मुंबईहून शिर्डीला पोहोचण्यासाठी दीड तासांचा वेळ वाचणार आहे. इगतपुरी ते भरवीर खुर्द या समृद्धी महामार्गाच्या सध्याच्या टप्प्यापर्यंतच्या २० किमीच्या अत्यंत खराब रस्त्यापासून वाहनचालकांची सुटका होत असल्याने चालकांना हा दिलासा मिळाला आहे.

    महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) बांधत असलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा २४.८७ किमी लांबीचा तिसरा टप्पा सोमवारी सुरू झाला. सिन्नरजवळच्या एसएमबीटी वैद्यकीय कॉलेजसमोरील भरवीर खुर्द ते इगतपुरीजवळील पिंपरी सद्रोद्दीन यादरम्यान हा टप्पा आहे. हा टप्पा सुरू झाल्याने आता मुंबईहून शिर्डी गाठण्यासाठीचा कालावधी इगतपुरीपासून जेमतेम दीड तासांवर असेल.

    याआधी मुंबईहून शिर्डीला जाण्यासाठी आग्रा रोडने नाशिकमार्गे जावे लागत होते. त्यात साडेपाच ते सहा तास लागत होते. समृद्धी महामार्गावरून भरवीर खुर्द येथून अवघ्या दीड तासांत शिर्डी गाठता येणे शक्य झाले आहे. मात्र, भरवीर खुर्दपर्यंत इगतपुरीमार्गे पोहोचण्यासाठी ‘राष्ट्रीय महामार्ग १६० अ’चा वापर करावा लागतो. चौपदरीकरणाच्या कामामुळे या मार्गाची धुळधाण झाल्याने वाहनचालकांना भरवीर खुर्दपर्यंत अवघे २० किमीचे अंतर कापण्यासाठी दीड ते दोन तासांचा अवधी लागतो. आता मात्र इगतपुरीवरूनच समृद्धी महामार्ग गाठता येणार असल्याने मुंबई-शिर्डी प्रवास करताना वेळ वाचणार आहे.
    Samruddhi Mahamarg: इगतपुरी ते नागपूर सुसाट, समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाची तारीख ठरली
    इगतपुरी-शिर्डी १८७ रुपये पथकर

    आता मुंबई-शिर्डी प्रवास समृद्धी महामार्गावरून करताना सोमवारी शुभारंभ झालेले इगतपुरी (पिंपरी सद्रोद्दीन) ते भरवीर खुर्द हे २५ किमी अंतर कापण्यासाठी जेमतेम १५ मिनिटे व तिथून पुढे आणखी ८२ किमी अंतरावरील शिर्डीसाठी अधिकाधिक सव्वा तासांचा अवधी लागेल. यासाठी १८७ रुपयांचा पथकर द्यावा लागेल; मात्र २० किमीच्या खराब रस्त्याचा त्रास वाचणार असल्याने इंधन बचत होईल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed