मंदिर परिसरात जत्रोत्सवाची तयारी गतिमानरित्या सुरु झाली आहे. आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी विकास मंडळ, शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणांकडून जत्रा सुरळीत पार पडण्यासाठी काम चालू आहे. व्यापारी बांधवांनी दुकाने थाटण्यास प्रारंभ केला असून विविध व्यावसायिकांची लगबग वाढल्याचे दिसून येत आहे. बिळवस ग्रामपंचायतीच्या वतीने सुद्धा पाणी पुरवठा, स्ट्रीट लाइट आदी कामे प्राधान्याने पूर्ण केली जात आहेत. यावर्षी आंगणेवाडी जत्रोत्सव संपल्यावर काही दिवसात कुणकेश्वर जत्रोत्सव असल्याने लाखो भाविकांची पावले आंगणेवाडीत वळणार आहेत.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या यात्रेचा सविस्तर आढावा घेतला आहे. या यात्रेला राजकीय नेत्यांची मांदियाळी पहायला मिळत आहे. या यात्रेला विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि त्यांच्या सोबत मंत्र्यांचं शिष्टमंडळ देखील असणार आहे. त्याचबरोबर कोकणातील केंद्रीय मंत्री आणि सिंधुदुर्गाचे सुपुत्र नारायण राणे देखील उपस्थित राहणार आहेत. म्हणून यासाठी जत्रेदिवशी रात्री व्हीआयपी मार्गावरील मसुरे देऊळवाडा दत्त घाटी येथे होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी जादा वाहतूक पोलीस या ठिकाणी तैनात करणे आवश्यक आहे. तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
रेल्वेचे आरक्षण फुल्ल
आंगणेवाडी जत्रोत्सवास मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी कोकणात येतात. या चाकरमान्यांना जिल्ह्यात येण्यासाठी रेल्वेचा प्रवास अधिक सोईस्कर आहे. सर्व रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. काही गाड्यांचे वेटिंग तिकीट सुद्धा उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे रेल्वेने सुद्धा १ मार्च रोजी रात्री कुर्ला टर्मिनस येथून विशेष रेल्वे सोडण्याचे जाहीर केले आहे. एकूणच जत्रापूर्व तयारीने बऱ्यापैकी वेग घेतला असून आंगणे ग्रामस्थ लाखो भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज होत असल्याचे चित्र आंगणेवाडीत दिसून येत आहे.