• Sat. Sep 21st, 2024
…तर मी घड्याळ चिन्हावर लढणार, शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रतिक्रिया

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याच्या आतापर्यंत चर्चा होत्या. त्या चर्चांवर शिक्कामोर्तब करणारं वृत्त समोर आलंय. जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तर मी घड्याळ चिन्हावर लोकसभा लढवायला तयार आहे. फक्त याबाबतचा निर्णय ६ मार्च नंतर होईल असे आढळराव पाटील यांनी सांगितले आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निवासस्थानी स्थानिक लोक प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली. या बैठकीत चर्चा करताना त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर आपली पुढील भूमिका असणार असल्याचे आढळराव पाटील म्हणाले आहेत.

शिरूर लोकसभा मतदार संघावर अजित पवारांनी दावा केला आहे. दुसरीकडे भाजपकडून देखील या मतदारसंघावर दावा करण्यात आलाय. मात्र खरी लढत आढळराव विरुद्ध कोल्हे अशीच असणार आहे. मात्र अद्याप जागांची निश्चिती झाली नसली तरी आढळराव पाटील लोकसभा लढविण्यास सज्ज आहेत. त्यांच्याकडून संपूर्ण तयारी देखील झाली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आदेश दिल्यानंतर आपण घड्याळ चिन्हावर लढू अशी माहिती त्यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉ. अमोल कोल्हे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, सत्ताधारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून अद्यापपर्यंत शिरूर लोकसभेचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.

शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याबाबत चाचपणी सुरू असून, आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, प्रदीप कंद यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आढळराव पाटील हेच अमोल कोल्हे यांना जड जाऊ शकतात अशी चर्चा मतदारसंघात होत आहे. त्यामुळे आढळराव पाटील वरिष्ठांसह स्थानिक कार्यकर्ते, नेत्यांशी चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून लोकसभेच्या रिंगणात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed