काही दिवसांपूर्वी राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी धडगाव, अक्कलकुवा भागात विविध विकासकामांच्या भूमिपूजनाप्रसंगी बारमाही रस्ते, वाडे पाडे जोडण्याच्या घोषणा केल्या आहेत. त्यातच आरोग्य यंत्रणेत कमालीची सुधारणा झाली असून नुकतेच खा. डॉ. हिना गावित यांनीदेखील मेडिकल हब उभे करण्याची घोषणा केली आहे. असे असले तरी दुसऱ्या बाजूला मात्र, वास्तव चित्र या घोषणा फोल ठरवणारे दिसून येत आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी बर्डी येथील गर्भवती माता कविता मगन राऊत (१९) गेल्या असता त्यांना त्रास होत असल्याने पिंपळखुटा येथून मोलगी येथे नेण्यासाठी रुग्णवाहिका देण्यात आली. मात्र, पिंपळखुटा ते मोलगीदरम्यान सुरगस जवळ संबंधित रुग्णवाहिका बंद पडली. तब्बल तासभर सुरु न झाल्याने मातेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली. यादरम्यान, त्यांची प्रकृती खालावली. यामुळे मोलगी येथून दुसरी रूग्णवाहिका येईपर्यंत उशीर झाला. यानंतर पर्यायी रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेले असता मातेचा मृत्यू झाला.
या घटनेने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेची अनास्था दिसून येत आहे. ही घटना घडली त्या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणीही वैद्यकीय अधिकारी नव्हते. हे पद रिक्त असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर तातडीने डॉ. मनोज पावरा यांना वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. कविता राऊत यांनी बाळाला जन्म दिला असून त्याची प्रकृती सुखरुप असली तरी आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा, अधिकारी, कर्मचाऱ्यांची उदासिनता यामुळे जन्मानंतर अवघ्या काही क्षणातच आईचा मृत्यू झाल्याने पोरकं होण्याची वेळ दुर्दैवी बाळावर आली असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गर्भवती मातेला पिंपळखुटा येथून पुढील उपचारासाठी मोलगी येथे घेऊन जात असताना रस्त्यातच रुग्णवाहिका बंद पडल्यामुळे ती बराच वेळ सुरू झाली नाही. त्या महिलेला पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे घेऊन गेले असता त्या महिलेचा मृत्यू झाला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी पद रिक्त होते. त्या ठिकाणी तातडीने एका वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, असं अक्कलकुवाच्या तालुका वैद्यकीय अधिकारी तृप्ती पटले यांनी सांगितलं.
माझ्या गर्भवती पत्नीला पिंपळखुटा येथून मोलगीकडे रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना सुरगस गावाजवळ रुग्णवाहिका नादुरुस्त असल्यामुळे बंद पडली. तेथेच माझ्या पत्नीने मुलाला जन्म दिला. मात्र, तिची प्रकृती खालावल्याने तिला पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे घेऊन जाणे गरजेचे होते. संबंधित रुग्णवाहिका बंद पडल्यामुळे दुसरी रुग्णवाहिका मोलगी येथून मागविण्यात आली. पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे घेऊन गेले असता नंदुरबार येथे माझ्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जर रुग्णवाहिका बंद पडली नसती तर माझ्या पत्नीचा जीव वाचू शकला असता. संबंधित कामचुकार कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मृत महिलेच्या पतीने केली आहे.