• Sat. Sep 21st, 2024

महू-हातगेघर धरणग्रस्तांचे प्रश्न फास्ट ट्रॅकवर सोडवा, जितेंद्र डूडी यांचे अधिकाऱ्यांना आदेश

महू-हातगेघर धरणग्रस्तांचे प्रश्न फास्ट ट्रॅकवर सोडवा, जितेंद्र डूडी यांचे अधिकाऱ्यांना आदेश

सातारा : महू-हातगेघर धरणग्रस्तांचे उर्वरित पुनर्वसनाचे सर्व प्रश्न तीन महिन्यात निकाली काढण्यात येतील. कोणाचे प्रश्न प्रलंबित असतील त्यांनी आपले अर्ज संबंधित विभागाकडे दाखल करावेत. अधिकाऱ्यांनी कोणताही विलंब न लावता तातडीने काय कारवाई केली याची अपडेट द्यावी. याबाबत कोणी हलगर्जीपणा केल्यास सबबी ऐकून घेणार नाही. अधिकाऱ्यांनी फास्ट ट्रॅकवर या प्रश्नांना प्राधान्य देवून ते तातडीने मार्गी लावावेत. बरोबर एक महिन्यानंतर मी याचा आढावा घेणार आहे, याच्यात दिरंगाई आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराच जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला.जावळी तालुक्यातील कुडाळी प्रकल्पांतर्गत महू – हातगेघर धरणग्रस्तांचे प्रश्न गेली २७ वर्षांपासून प्रलंबित आहेत. धरणाचे बांधकाम ९५ टक्के झाले, मात्र धरणग्रस्तांचे पुनर्वसन करणे शिल्लक आहे. त्यात अनेक अडचणी आहेत. या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आज जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांचे समन्वयक मिलिंद शिंदे यांच्यासमवेत धरणग्रस्तांची बैठक पार पडली.

या बैठकीत संकलन दुरुस्ती, जमिनीचे न्यायप्रविष्ठ प्रश्न, गावठाण सीमांकन, एकुमॅ प्रश्न, वंचित धरणग्रस्तांना लाभक्षेत्रातील जमीन देणे, मूळ मालकाकडून येणाऱ्या अडचणी, कजाप, ईश्वर चिट्ठीद्वारे देण्यात आलेल्या जमिनी, जमिनीतून गेलेल्या कॅनालमुळ बाधित जमिनी, ज्यांना अद्याप जमिनी मिळाल्या नाहीत असा अनेक प्रश्नांवर यावेळी चर्चा करून काही ठोस निर्णय घेण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे धरणग्रस्त काहीअंशी खुश होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी धरणग्रस्तांविषयी असलेली भावनिक तळमळ व्यक्त केली आणि तुमचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे अभिवचनही दिले.

महू-हातगेघर धरणाचे उर्वरित काम उद्यापासून सुरू करणार असल्याचे कार्यकारी अभियंता विकास पाटील यांनी सांगितले. त्यावेळी धरणग्रस्तांनी काम सुरू करण्यास विरोध केला. फक्त सिंचनाचे काम सुरू करावे. उर्वरित काम करू नये, असा आग्रह धरला. धरणाचे काम सुरू करण्यावरून धरणग्रस्त आणि अधिकारी यांच्या शाब्दिक खडाजंगी झाली. तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितले, की एक महिन्यात पुनर्वसनाचे प्रश्न सोडविणार असून तुम्ही विरोध करू नका. यावर धरणग्रस्त आक्रमक झाले. धरणाची सर्व कामे सुरू करण्यास धरणग्रस्तांनी विरोध करताच जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी तुम्ही आता २७ वर्ष पुनर्वसनासाठी झटत आहात. आता निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे. तुम्ही काम सुरू करू देत नाही, तर आणखी २७ वर्ष लढा म्हणजे तुमचे प्रश्न सुटतील, असा उपरोधिक दमच जिल्हाधिकाऱ्यांनी धरणग्रस्तांना भरला.

धरणग्रस्तांच्या टाळ्या अन् जिल्हाधिकारी वैतागले

गेल्या २७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. मात्र, या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आणि तसे आदेश प्रांताधिकारी, तहसीलदार, भुमिअभिलेखाधिकारी तसेच पुनर्वसन अधिकाऱ्यांना दिले. मात्र, हे करत असताना काही निर्णय धरणग्रस्तांच्या बाजूने चांगल्या पद्धतीने घेतल्याने धरणग्रस्त टाळ्या वाजवून जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत करत होते. मात्र, वारंवार घडणाऱ्या या घटनेमुळे जिल्हाधिकारी वैतागले आणि तुम्ही जर टाळ्या वाजवल्या ना तर…! असे काहीसे बोलून गेले. त्यानंतर टाळ्यांना कुठेतरी विराम मिळाला.
ठाकरेंपासून मनाने दुरावलो, मैत्री उरलेय का त्यांनाच विचारा; देवेंद्र फडणवीसांच्या भावना

जावळीचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून झाडाझडती

महू धरणातील बहुतांश प्रश्न हे जावळी तहसील कार्यालयाशी संबंधित आहेत. यावेळी उपस्थित झालेल्या संकलन रजिस्टरच्या प्रश्नाबाबत तहसीलदार हणमंत कोळेकर यांना जिल्हाधिकाऱ्यांना पुरेशी अभ्यासपूर्ण माहिती देता आली नाही. त्यामुळे ठोकळ उत्तरे न देता अभ्यासपूर्ण आणि धरणग्रस्तांच्या संकलन रजिस्टरची प्रलंबित राहिलेल्या कामाचा खुलासा करून लवकरात लवकर निपटारा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कोळेकर यांना दिले. मात्र, यावेळी कोळेकर यांची मात्र त्रेधा उडाली आणि तहसीलदार कोळेकर यांच्या कामकाजावर जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
लाल वादळ आज नाशिकमध्ये धडकणार, शेतकरी करणार चक्का जाम, काय आहेत मागण्या?

ओंबळेंना जिल्हाधिकाऱ्यांचा कळवळा?

महू धरणातील वहागाव येथील ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार आपल्या प्रश्नांची सरबत्ती करत होते. त्यावेळी मात्र एकनाथ ओंबळेंना जिल्हाधिकाऱ्यांचा मध्येच कळवळा आला आणि अचानक त्यांनी सर्व काही ठीक सुरू आहे. तुम्ही असे प्रश्न का करताय. जे होतेय हे चांगलं होतंय. जिल्हाधिकारी चांगले मदत करतायेत, असा एक प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांना सहानुभूतीचा कळवळा ओंबळे दाखवत होते.

वसंत मोरे यांनी घेतली सुप्रिया सुळे आणि शरद पवारांची भेट, मैदान वाचविण्यासाठी पवारांना साकडे?

एजंट, व्यापाऱ्यांना बाजूला ठेवा : शिंदे

धरणग्रस्तांना मिळालेल्या लाभक्षेत्रातील जमीन म्हणजे एजंट, व्यापाऱ्यांसाठी सोनं देणारी कोंबडीच. महू- हातगेघर धरण सुरू झाल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवणारे हे धरणग्रस्त मेटाकुटीला आलेत, पण याचा गैरफायदा एजंट, लँडमाफिया करून घेत आहेत. पुनर्वसन कार्यालयांमध्ये धरणग्रस्तांऐवजी हीच लोक पहिल्यांदा पोहोचत असताना दिसत आहेत, याचा दाखला देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालयीन समन्वयक मिलिंद शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धरणग्रस्तांची बाजू मांडत असताना एजंट आणि व्यापाऱ्यांना थोडं दूरच ठेवा आणि धरणग्रस्तांना जवळ करा, सांगून धरणग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी विनंतीही केली.
अंबडमध्ये संचारबंदी, मनोज जरांगेकडून मी पुन्हा येईनची भूमिका, अंतरवाली सराटीत दाखल, फडणवीसांवर टीका सुरुच
या वेळी वहागाव, रांजणी, दापवडी, बेलोशी, महू, टोम्पेवाडी, कावडी, हातगेघर, विवर व काटवली येथील धरणग्रस्त व शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धरणग्रस्तांच्या या बैठकीमध्ये चांगले निर्णय घेतल्याने जिल्हाधिकाऱ्यांची स्तुती करून त्यांचे स्वागतही करण्यात येत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed