• Fri. Jul 24th, 2026

    राज्यपालांच्या उपस्थितीत १६७ वा आयकर दिन साजरा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 24, 2026
    राज्यपालांच्या उपस्थितीत १६७ वा आयकर दिन साजरा – महासंवाद

    मुंबई, दि.२४ : तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शकता वाढवून, कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करून आणि करदात्यांचा विश्वास संपादन करून स्वतःला जनस्नेही संस्थेमध्ये रूपांतरित केल्याबद्दल राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आयकर विभागाचे अभिनंदन केले. ‘एकेकाळी ‘भीतीदायक’ म्हणून ओळखला जाणारा आयकर विभाग आज ‘जनस्नेही मित्र’ बनला आहे,”असे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले. राज्यपालांच्या उपस्थितीत आयकर विभागाचा १६७ वा स्थापना दिवस विभागाच्या मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील कौटिल्य भवन येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

    भारत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना आयकर विभागाचे योगदान अधिक महत्वाचे असल्याचे राज्यपालांनी सांगितले. कर महसुलामुळे देशात सार्वजनिक शाळा, रुग्णालये, रस्ते, पायाभूत सुविधा तसेच विविध कल्याणकारी योजनांची उभारणी शक्य झाली असून, देशाच्या प्रगतीत विभागाचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. देशातील प्रत्यक्ष कर संकलनात महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा असून, मुंबईने देशाची आर्थिक राजधानी म्हणून आपले स्थान कायम राखले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    मुंबई मेट्रो, कोस्टल रोड प्रकल्प, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प हे करदात्यांच्या योगदानाचे जिवंत उदाहरण असल्याचे सांगून, या प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था, संपर्क, आर्थिक विकास आणि भविष्यासाठी सक्षम शहर उभारण्यास मोठी चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘अग्रीम कर’ हा देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे सांगून प्रत्येक करदात्याने अग्रीम कर आपली सामाजिक जबाबदारी समजून भरावा, असे आवाहन केले.

    मुंबईचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त आलोक कुमार यांनी आयकर विवरणपत्र दाखल करण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन खाद्यपदार्थ मागविण्याइतकी सुलभ झाल्याचे सांगितले. २०१९ मध्ये आयकर विवरणपत्रावर प्रक्रिया करण्यासाठी ८२ दिवस लागत असताना आज ती काही दिवसांत पूर्ण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. परताव्याची (रिफंड) रक्कमही अत्यंत जलद दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आयकर विभाग सर्व शासकीय विभागांमध्ये आघाडीवर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात मुंबईचे योगदान अनेक राज्यांपेक्षाही अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले.

    अभिनेते विकी कौशल यांनी आयकर विभागाला स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा देत आयकर दिन समारंभात सहभागी होताना अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली.

    0000

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed