• Sun. Mar 8th, 2026

    मुंबई येथील अन्न चाचणी प्रयोगशाळेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदुष्य प्रणालीद्वारे उद्घाटन

    ByMH LIVE NEWS

    Feb 25, 2024
    मुंबई येथील अन्न चाचणी प्रयोगशाळेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदुष्य प्रणालीद्वारे उद्घाटन

    मुंबई. दि 25 – सुरक्षा मानक प्राधिकरण नवी दिल्ली व अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्यातील सामंजस्य करारअंतर्गत मुंबई येथे उभारण्यात आलेल्या अन्न चाचणी मायक्रोबायोलॉजिकल प्रयोगशाळेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणाली द्वारे उद्घाटन करण्यात आले. देशातील अन्न चाचणी प्रणाली बळकट करण्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येत आहेत.नवीन मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा सुरु झाल्यानंतर अन्न चाचणीमध्ये महाराष्ट्र राज्य सक्षम तर होईलच त्याबरोबर महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षेच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलेल असा विश्वास यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव आत्राम बाबा यांनी व्यक्त केला.

    यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या समारंभा वेळी औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, खासदार पूनम महाजन, आयुक्त (अन्न) अभिमन्यू काळे उपस्थित होते.

    यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, अन्न चाचणी मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेत अन्नसुरक्षा समिती करण्यासाठी कर्मचारी वर्ग इतर अनुषंगिक सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच लॉजिकल विश्लेषण करण्यासाठी कर्मचारी वर्ग नियुक्त केले जाणार आहे. यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सध्या राज्यामध्ये तीन प्रयोगशाळा असून आता त्या पाच ठिकाणी उभारण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मायक्रोबायोलॉजी प्रयोग शाळेसाठी प्रत्येकी 450 कोटीचा निधी केंद्र सरकारने दिलेला आहे. सदर निधी हा प्रयोगशाळा उभारण्यासाठी आणि उपकरणांसाठी तसेच तीन वर्ष तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या खर्चासाठी दिलेला आहे. सध्या संभाजीनगर येथील प्रयोगशाळेचे काम पूर्ण होत आलेले आहे. महाराष्ट्र शासन या प्रयोगशाळा उभारणीचे कामकाज अचूक व जलद गतीने करण्यासाठी प्रयत्नशील आहे. लवकर संभाजीनगर येथील प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    खासदार पूनम महाजन म्हणाल्या की, महाराष्ट्र प्रत्येक गोष्टीत अग्रणी आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या अन्न निर्यातीमध्ये 15 टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून देशात आणि देशाबाहेर अन्न पुरवले जाते. अन्नावर प्रक्रिया करुन ते देशात-परदेशात निर्यात करणे ही शेतकऱ्याची ताकद आहे. सामान्य व्यक्तीला प्रथिनेयुक्त व भेसळविरहित अन्न देण्यासाठी एफडीआय चे अधिकारी व कर्मचारी मेहनत घेत आहेत. यानिनमित्ताने त्यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

    या प्रयोगशाळा उद्गाटन समारंभास मान्यवर पदाधिकारी, विभागातील कर्मचारी अधिकारी तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed