• Sat. Sep 21st, 2024

कॉंग्रेसला मिळाली ‘ऊर्जा’, मुंबईत बैठकीसाठी बहुतांश आमदार उपस्थित, भारनियमनावर करणार आता प्रहार

कॉंग्रेसला मिळाली ‘ऊर्जा’, मुंबईत बैठकीसाठी बहुतांश आमदार उपस्थित, भारनियमनावर करणार आता प्रहार

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी पक्षत्याग केल्यानंतर त्यांच्यासोबत जाण्याचा संशय असलेले ४-५ आमदार गुरुवारी मुंबईत काँग्रेसच्या बैठकीसाठी हजर झाले. त्यामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला. पक्षाची एकमेव जागा अविरोध येईल, असा विश्वास उंचावला. दरम्यान, ग्रामीण भागातील भारनियमनावरून सरकारला घेरण्यात यावे, अशी सूचना पक्षाने स्थानिक पदाधिकाऱ्यांना केली.

काँग्रेसचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या नामांकनासाठी गुरुवारी मुंबईत बैठक झाली. त्यात विदर्भातील सर्वच आमदार उपस्थित असल्याचा दावा नेत्यांनी केला. धोका टळल्याचे मानले जात असून दोन दिवसांपासून असणारा तणाव थोड्याप्रमाणात दूर झाल्याचे मानले जात आहे. बैठकीस जिल्ह्यातील माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, राजू पारवे आदी उपस्थित होते.

यंदा शेतकऱ्यांना दोन्ही हंगामांत जबरदस्त फटका बसला. आता भारनियमनामुळे आणखी नुकसान होण्याचा धोका आहे. कृषिपंपांना १२ तास वीज देण्याचे आश्वासन सरकारने दिल्यानंतरही आठ तास वीज मिळत नाही. राज्यातील महायुती सरकार शेतकरीविरोधी आहे, असा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

भाजपचे ‘गाव चलो अभियान’ बरेच गाजले. सरकारविरुद्ध काँग्रेसही ग्रामीण भागात आक्रमक होणार आहे. विजेच्या प्रश्नावरून १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान ब्लॉक पातळीवर आंदोलन करण्याची सूचना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. सर्व जिल्हा व शहराध्यक्षांना आंदोलनासाठी सज्ज होण्यास प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी कळवले. यात आजी-माजी आमदार, खासदार, पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांनाही सहभागी करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी आमदार नितीन देशमुख रस्त्यावर, हमीभावावरून मोदींवर साधला निशाना

सचिवांमध्ये खदखद

प्रदेश काँग्रेसच्या राज्यस्तरीय शिबिरात उपाध्यक्ष व सरचिटणीसांनाच आमंत्रित केल्यानंतर सचिवांमध्ये असंतोष उफाळून आला. निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या या धोरणात्मक कार्यक्रमापासून प्रमुख पदाधिकाऱ्यांना वंचित ठेवण्यात आल्याची खदखद व्यक्त होऊ लागली आहे. यापूर्वीही प्रशिक्षण शिबिरात सचिवांना डावलण्यात आले. या पदाची गरज नसल्यास ठेवू नये, अशी प्रतिक्रिया प्रदेश सचिव कमलेश समर्थ यांनी दिली. ‘गेल्या चार दशकांपासून पक्षाचे काम करत आहे. माझ्यापेक्षाही काही ज्येष्ठांना अद्याप त्यांच्या ज्येष्ठतेनुसार अपेक्षित पद मिळालेले नाही. २-४ वर्षांत पक्षात आलेले आणि नेत्यांची बॅग उचलणाऱ्यांना मोठी पदे देण्यात आली. सरचिटणीस करण्यात आले. अजूनही वेळ गेलेली नाही, पक्षाने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सन्मान करावा’, असेही समर्थ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed