• Tue. Mar 10th, 2026

    पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रवास होणार सुखकर, तेली गल्ली उड्डाणपूल कधी होणार सुरू? जाणून घ्या

    पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रवास होणार सुखकर, तेली गल्ली उड्डाणपूल कधी होणार सुरू? जाणून घ्या

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अंधेरी पूर्वेकडील गोखले पुलाला पश्चिम द्रुतगती महामार्गाशी जोडणारा नव्याने बांधलेला तेली गल्ली उड्डाणपूल फेब्रुवारीअखेरीस सुरू करण्यात येणार आहे. दोन्ही पूल एकाचवेळी सुरू होणार असल्याने पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रवास सुकर होणार आहे. तेली गल्ली पुलाची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत.

    अंधेरी पूर्व ते पश्चिमेतील तेली गल्लीतील वाहतूक समस्येवर मात करण्यासाठी मुंबई महापालिकेने २०१८मध्ये या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला. पुलाचे काम २४ महिन्यांत पूर्ण करायचे होते. मात्र पूलउभारणीला बरीच वर्षे लागली. हा पूल वेळेत सुरू झाला असता तर गोखले पूल बंद झाल्यानंतर त्याचा वापर होऊन वाहतूक समस्या सुटली असती. मात्र, आता २५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या गोखले उड्डाणपुलाबरोबरच तेली गल्ली पूलही सुरू करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.

    तेली गल्ली पूल हा अंधेरी पश्चिमेकडील पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि एस. व्ही. रोडशी थेट जोडलेला आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व ते पश्चिम असा सहज प्रवास करता येऊ शकणार आहे. पूर्वेकडील हॉटेल रिजन्सी जंक्शन आणि तेली गल्ली जंक्शन येथील वाहतूककोंडीतून यामुळे सुटका होईल. सध्या एस. व्ही. रोडपासून पश्चिम द्रुतगती महामार्गादरम्यान दोन किमी अंतर कापण्यासाठी सुमारे २० मिनिटे लागतात. तेली गल्ली पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर हे अंतर पाच ते १० मिनिटांत पार करता येणार आहे. या पुलाची लांबी ५७० मीटर आहे. पुलाच्या बांधकामाची योजना तयार केली, तेव्हा अंदाजे ८० कोटी रुपये खर्च होता. हाच खर्च १५० कोटींच्या वर गेला आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘अटल सेतू’ स्वच्छतेस प्रारंभ

    गोखले उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात

    अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले उड्डाणपुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. याची एक दिशा २५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. मार्च २०२४मध्ये या पुलावर दुसरा गर्डर बसवण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. साधारण एप्रिल-मे महिन्यात काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण होतील. त्यानंतर दुसरा टप्पा सुरू करण्यावर अंतिम निर्णय होईल. गोखले पूल संपताच तेली गल्लीचा उड्डाणपूल येतो. या पुलाचे काम पूर्ण झाले होते. मात्र त्याची दुरवस्था उघड झाल्यानंतर पुन्हा काम हाती घेण्यात आले होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed