गेल्या आठवड्यात गुरुवारी फेसबुक लाईव्ह दरम्यान अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बोरिवली पश्चिमेला असलेल्या आयसी कॉलनीतील मॉरिसच्या कार्यालयात ही घटना घडली. अभिषेक यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर मॉरिसनं स्वत:वर गोळी झाडली. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडून सुरू आहे. मॉरिसनं हत्या आणि आत्महत्येची योजना आधीपासूनच आखली होती. त्याच्या डोक्यात हा कट आधीच शिजला होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.
मॉरिसनं त्याचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राचं पिस्तुल अभिषेक यांच्या हत्येसाठी वापरलं. अभिषेक यांच्यावर गोळीबार झाला त्यावेळी मिश्रा घटनास्थळी नव्हता. मॉरिसनंच त्याला रुग्णालयात पाठवलं होतं. कामावर असताना पिस्तुल कार्यालयातील लॉकरमध्येच ठेवायचं अशी अजब अट मॉरिसनं मिश्राला नोकरी देताना ठेवली होती. त्याच अटीवर त्याला नोकरी देण्यात आली होती. मॉरिसनं आखलेल्या कटाची कल्पना मिश्राला होती का याचा तपास पोलीस करत आहेत.
अभिषेक यांच्या हत्येचा कट मॉरिसनं अतिशय थंड डोक्यानं आखला होता. त्यानंच अभिषेक यांना स्वत:च्या कार्यालयात भेटण्यास बोलावलं. फेसबुक लाईव्हच्या बहाण्यानं अभिषेक यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्यापासून दूर ठेवलं आणि संधी मिळताच त्यांना संपवलं, अशी माहिती पोलिसांनी दिली. मॉरिसनं मिश्राला लॉकरमध्ये पिस्तुल ठेवायला सांगितल्यानं यावर शिक्कामोर्तब होत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
अभिषेक यांना संपवण्याचा विचार मॉरिसच्या डोक्यात गेल्या वर्षीपासूनच सुरू होता. त्यासाठी त्यानं पिस्तुलाचा परवाना मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे त्यानं डिसेंबरच्या अखेरीस मिश्राला अंगरक्षक म्हणून नेमलं. मॉरिसच्या जीवाला कोणताही धोका नसताना त्यानं अंगरक्षक नेमला होता. त्यामुळे मॉरिसनं हत्या आणि आत्महत्येची योजना थंड डोक्यानं आखल्याचं स्पष्ट होत आहे.
