• Sat. Sep 21st, 2024

दहा वर्षांत तुम्ही काय केले? उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना बोचरा सवाल, भारतरत्न पुरस्कारांवरुन टीका

दहा वर्षांत तुम्ही काय केले? उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींना बोचरा सवाल, भारतरत्न पुरस्कारांवरुन टीका

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई:‘पंडित नेहरू यांनी काय काम केले, असा सवाल तुम्ही करता. पण तुमची सलग दहा वर्षे देशात सत्ता आहे, त्या काळात तुम्ही काय काम केले?’ असा बोचरा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मतांवर डोळा ठेवून ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर केल्याची टीकाही त्यांनी केली.

शिवसेना प्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त रविवारी मुंबईत आयोजित महाअधिवेशनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार, भाजप आणि राज्य सरकारवर चौफेर टीका केली.

‘सध्या देशात निवडणुकीचे वातावरण आहे. भारतरत्न पुरस्काराबद्दल आतापर्यंत एक सूत्र होते. परंतु ‘आले मोदींच्या मना…’ असे सध्या सुरू आहे. बिहारमध्ये माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार दिला. ठाकूर यांनी बिहारमध्ये पहिल्यांदा २६ टक्के आरक्षण लागू केले होते. त्यावेळी जनसंघाने त्याला विरोध केला होता. आता बिहारमधील मतांवर डोळा ठेवून पुरस्कार जाहीर केला आहे’, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

चोरायला बाळासाहेब वस्तू नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
‘भाजपकडे प्रचंड पैसा असून तो निवडणूक आणि प्रचारात वापरला जातोय. गेल्या वर्षात भाजपने निवडणुकीवर १३०० कोटी रुपये खर्च केल्याची बातमी वाचली. ते भाडोत्री माणसे कामाला लावून दबाव आणत आहेत. मात्र एक वेळ मी कुटुंबासह आत्महत्या करेन, पण भाजपला मत देणार नाही, अशी शेतकऱ्यांची आणि लोकांची संतप्त भावना आहे’, असे ते म्हणाले.

मुंबईत आस्थापनेत, कंपनीत नोकरी मिळावी, यासाठी आपण स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून अनेक आंदोलने केली. परंतु आता मुंबईतील सगळी कार्यालये बाहेर जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार नाही, असेही ते म्हणाले.

‘हे त्यांच्या मित्रपक्षाला संपवत आहेत. हे मी नाही; गडकरी बोलत आहेत. सध्या पक्षात त्यांनाच स्थान नाही’, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. आधीच भेकड शिंदेंकडे गेले आहेत. आणखी काही असतील त्यांनीही जावे, मी मूठभर शिवसैनिकांना घेऊन पुढे जाईन’, असेही ते यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रात गादीसाठी वडिलांचे विचार सोडून लोक काहीही करतात; अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

‘आमच्या घराणेशाहीला विरोध असेल, तर तुमच्या एकाधिकारशाहीलाही आमचा विरोध आहे. आपल्याकडे पैसे नाहीत. मात्र सोन्यासारखी माणसे आहेत. अनेक ठिकाणी मुस्लीम समाज आपल्यासोबत येतोय. मी म्हणतो, मी कडवट हिंदू आहे. त्यावेळी ते म्हणतात, तुमच्या आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक आहे. माणसाने धर्म घडवलाय, धर्माने माणून बिघडवू नका’, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed