• Sat. Sep 21st, 2024
राज्यातील जलसाठा ५३ टक्क्यांवर; गतवर्षीच्या तुलनेत यंदा भीषण चित्र, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

चंद्रपूर : उन्हाळ्याची चाहुल लागण्यापूर्वीच राज्यातील लघु, मध्यम व मोठ्या धरणांमध्ये केवळ ५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा २६ टक्क्यांनी कमी आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर वगळता राज्याच्या इतर विभागातील ५४५ गावांत व १ हजार १६२ वाड्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

राज्यातील २ हजार ९९४ प्रकल्पांची एकूण ४० हजार ४८५ दशलक्ष घनमीटर जलसाठा क्षमता आहे. यात सध्या २१ हजार ६५७ दशलक्ष घनमीटर साठा उरला आहे. २०२३मध्ये हा पाणीसाठा याच कालावधीत ७९.४३ टक्के होता. विदर्भातील धरणांच्या जलसाठ्याची स्थिती बघता अमरावती विभागात ६४ तर नागपूर विभागात ६१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नागपूर विभागातील ३८३ प्रकल्पांची एकूण ४ हजार ६०६ दशलक्ष घनमीटर जलसाठा क्षमता आहे. त्यात २ हजार ८११ दशलक्ष घनमीटरवर जलसाठा उरला आहे. अमरावती विभागातील २६१ प्रकल्पांची एकूण ३ हजार ७७४ दशलक्ष घनमीटर क्षमता असून २ हजार ४०३ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आहे. या भागातील बुलढाणा जिल्ह्यातील तीन गावांत टँकर लागले आहेत. आगामी काळातील पाण्याची मागणी, बाष्पीभवनाचा वेग बघता धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पाणी नियोजनाची गरज व्यक्त होऊ लागली आहे. २०१६मध्ये राज्यात तीव्र पाणीटंचाई भासली होती हे विशेष.
पुरुषांचं आरोग्य खालावतंय; राज्यात ‘या’ आजाराचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात, काय सांगते आकडेवारी?
नाशिक विभागात सर्वाधिक पाणीटंचाई

नाशिक विभागात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. या विभागात २२८ गावे आणि ३१९ वाड्यांमध्ये १५२ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात १६३ गावे आणि ४२ वाड्यांमध्ये २२६ टँकरने, पुणे विभागात १५० गावे आणि ७९८ वाड्यांमध्ये १५४ टँकरने, अमरावती विभागातील तीन गावांत तीन टँकरने तर ठाणे व कोकण विभागात एक गाव व तीन वाड्यांत दोन टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

धरणांतील पाणीसाठ्याची विभागवार स्थिती

कोकण : ६८%
मराठवाडा : ३१ %
नागपूर : ६१%
अमरावती : ६४%
नाशिक : ५६%
पुणे : ५५%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed