• Sat. Sep 21st, 2024

१३ नद्या बनणार ‘अमृत वाहिनी’; विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश, कोणत्या नद्यांचा समावेश?

१३ नद्या बनणार ‘अमृत वाहिनी’; विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश, कोणत्या नद्यांचा समावेश?

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘चला जाणूया नदीला’ अभियानाच्या माध्यमातून नदीचा प्रवाह पूर्ववत करीत नदी पात्रातील अतिक्रमण, गाळ काढणे तसेच नदी स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. विभागातील १३ नद्यांचा ‘अमृत वाहिनी’ म्हणून विकास करण्यात येणार आहे. नदी संवाद यात्रेच्या माध्यमातून विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाचे राज्यस्तरीय सदस्य जलपुरुष राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत गुरुवारी आढावा घेण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा (नागपूर), विवेक जॉनसन (चंद्रपूर), एस. एम. कुर्तकोटी (भंडारा), अभियानाचे राज्य समन्वयक रमाकांत कुळकर्णी, जलबिरादरीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र चुघ, डॉ. प्रवीण महाजन आदी उपस्थित होते.

प्रवाह रोखणारे अतिक्रमण हटवा

उगमस्थान ते संगमापर्यंत या नद्यांच्या पात्रांचा महसूल विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार आराखडा तयार करणे आवश्यक आहे. नदीचे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा ठरणारे अतिक्रमणे काढावीत, तसेच नदीप्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. नद्यांच्या पात्रात नवीन बांधकाम होणार नाही याची दक्षता घ्यावी. अभियानांतर्गत नदीचा आराखडा तयार केल्यानंतर नोडल अधिकारी व नदीप्रहरी यांच्या नियमित बैठकी जिल्हाधिकारी यांनी घेऊन प्रगतीचा आढावा घ्यावा, अशी सूचना राजेंद्र सिंह यांनी केली.
अस्पर्शित लक्षद्वीप पर्यटकांच्या लोंढ्यासाठी लक्षद्वीप सज्ज आहे का? कसे पोहोचावे? कुठे भेट द्यावी, किती खर्च
या नद्यांचा समावेश

नागपूर : नाग नदी (५६ किलोमीटर), साधुखोरा (आंब) (२५.५ किलोमीटर)
गोंदिया : चूलबंद नदी (२८ किमी)
चंद्रपूर : उमा नदी (१३० किमी), इरई नदी (१०४ किमी)
गडचिरोली : खोब्रागडी नदी (८१ किमी), कठाणी नदी (७० किमी), पोहरा/ पोपखोडी नदी (५४ किमी)
वर्धा : धाम नदी (८६ किमी), वेना नदी (८६ किमी), यशोधा नदी (४४५ किमी)
भंडारा : चूलबंद व वैनगंगा नदी

या सूचनांचे पालन करा

-नदी साक्षरता वाढविण्यासोबतच नागरिकांच्या सहकार्याने नदीचा सर्वंकष अभ्यास करून आराखडा तयार करण्यात येत आहे.
-जिल्हाधिकारी यांनी नोडल अधिकारी तसेच नदी प्रहरी यांच्या माध्यमातून नदी प्रवाह पूर्ववत करण्यासाठी उपाययोजना सूचवायच्या आहेत.
-पावासाळ्यापूर्वी या अभियांनांतर्गत निवडण्यात आलेली कामे पूर्ण करावीत, अशा सूचना यावेळी विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या.
-शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून खोलीकरण, रुंदीकरण, गावातील सांडपणी व घनकचरा व्यवस्थापन आदी बाबींवर उपाययोजना कराव्यात तसेच पर्यावरणाच्या दृष्टिने नदी स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे, अशा सूचना राजेंद्र सिंह यांनी केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed